खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड पायथ्याच्या घेरा सिंहगड आतकरवाडी येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबविण्यात आलेली 92 लाख रुपयांची पाणी योजना फसली आहे. त्यामुळे आतकरवाडी, घेरा सिंहगड व वाड्या-वस्त्यांतील पाणीटंचाई गंभीर बनली आहे. या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे करून अधिकारी व ठेकेदार मात्र मालामाल झाले असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. तीन वर्षांपूर्वी आतकरवाडीच्या डोंगरात पाण्याची टाकी उभारण्यात आली. खडकवासला धरणावरून थेट गडाच्या पायथ्याला जलवाहिनी टाकण्यात आल्या. मात्र, निकृष्ट दर्जाच्या जलवाहिनी सतत फुटत असल्याने टाकीत पाणी गेले नाही. त्यामुळे या योजनेचे थेंबभरही पाणी आदिवासी व इतर समाजाला मिळाले नाही. निविदेप्रमाणे जलवाहिनी टाकण्यात आल्या नाहीत. तीन फूट खोदकाम न करता वरवर खोदकाम करून वेगवेगळ्या आकाराच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. तसेच, पंपही कमी क्षमतेचा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या योजनेत गैरव्यवहार झाला असून, याबात गेल्या दोन वर्षांपासून ग्रामस्थ पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली नाही. जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे आदिवासी महादेव कोळी समाजासह स्थानिक रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने या ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत महिला, मुले व नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. आतकरवाडी येथील जुन्या योजनेच्या विहिरीत जलजीवन योजनेचे पाणी सोडले जाते. मात्र, जलवाहिनी फुटत असल्याने ग्रामपंचायतही हतबल झाली आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही योजना पुरती फसली आहे. निविदेप्रमाणे काम करण्यात आले नसल्याने गावाला पाणी मिळाले नाही. या योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. निविदेनुसार कामातील त्रुटी तातडीने दूर करण्यात याव्यात.
-पांडुरंग सुपेकर, माजी सरपंच, आतकरवाडी
आतकरवाडी पाणी योजनेची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार आहे. याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
-के. एन. खरात, उपविभागीय अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद
हेही वाचा