नारायणगाव: जुन्नर तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे मोठ्या प्रमाणावर रखडली असून, ‘हर घर नलसे जल’चे उद्दिष्ट अद्याप पूर्णत्वास आलेले नाही. तालुक्यातील 155 गावांपैकी केवळ 49 गावांत योजना पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी पूरक व वाढीव कामे अपूर्ण असल्याने अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
ग््राामीण भागातील महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा कायमस्वरूपी उतरवण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात 100हून अधिक गावांमध्ये कामे अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
काही ठिकाणी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी जुनी लाईन काढण्याचे काम सुरू असून, अनेक गावांत नळजोडण्या झालेल्याच नाहीत. काही ठिकाणी टाकलेले पाईप चोरीला गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
कामे रखडण्यामागे ठेकेदारांना निधी न मिळणे हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून बिले मिळाली नसल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे त्यांनी जुन्नर पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ‘काम बंद’ आंदोलनाचा फ्लेक्स लावून निषेध नोंदवला आहे. ’निधी मिळेपर्यंत कामे बंद राहतील,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निधीअभावी कामे ठप्प झाल्याने नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करून महिलांना दिलासा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, योजना अपूर्ण राहिल्याने सरकारी दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक पातळीवर नाराजी तीव होत आहे.