पुणे: यंदा अल निनोमुळे मान्सून हंगाम बहुतांश भागात खूप कमी पावसाचा गेला. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात तीन चक्रीवादळांची शक्यता आहे.
त्यामुळे ऑक्टोबरमध्ये परतीचा आणि नंतर अवकाळी पाऊस असे सत्र सुरू होऊ शकते, असा प्राथमिक अंदाज भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) उपग्रहाने दिला आहे.
इस्रोच्या उपग्रहाने दिलेल्या अंदाजानुसार ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान उत्तर हिंद महासागरावर तीन उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची शक्यता दर्शवतो. स्पेस ॲप्लिकेशन सेंट, इस्रो, मोसडॅकद्वारे संयुक्तरीत्या हा अंदाज नुकताच देण्यात आला आहे.
नेमकी कारणे काय?
एकत्रित पॉवर डिसिपेशन इंडेक्स या गणितीय मॉडेल नुसार शास्त्रज्ञांनी चक्रीवादळांची ४४ वर्षांची सरासरी तपासली.
नैर्ऋत्य मान्सूनही १९ सप्टेंबरपासून माघारीचा टप्पा गाठत आहे. पश्चिम राजस्थानातून सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला तो महाराष्ट्रातून जाणार आहे. त्यामुळे राज्यात परतीचा मान्सून चांगला बरसू शकतो.
ऑक्टोबर ते डिसेंबर या संक्रमण काळात, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील कमी दाब प्रणालीच्या विकासासाठी अनुकूल होऊ शकते.
इस्रोच्या अंदाजाचा नेमका अर्थ काय?
सॅक या हंगामी मॉडेलनुसार ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान उत्तर हिंद महासागरावर तीन उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची शक्यता दर्शवते. बंगालच्या उपसागराने अरबी समुद्रापेक्षा जास्त चक्रीवादळे निर्माण केली आहेत. उबदार समुद्राचेपाणी, उच्च वातावरणातील आर्द्रता आणि मोसमी वारे चक्रीवादळास पूरक ठरू शकतात.
राज्यात २२ पर्यंत हलका पाऊस
राज्यात २२ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोर राहील. कोकण, विदर्भात तुलनेने कमी पाऊस राहील. दरम्यान, राजस्थानातून परतीच्या पावसाला अनुकूल स्थिती होत आहे, तेथे १९ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
१९ सप्टेंबर रोजी अंदमान समुद्र आणि आसपासच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ च्या सुमारास हलक्या पावसाने हजेरी लावल्याने कमाल तापमानात किंचित घट झाल्याचे दिसून आले