पुणे: भारतीय जनमानसात मोलाचे स्थान असलेली रेल्वे म्हणजे फक्त दळवळण किंवा प्रवासाचे साधन नाही, तर रेल्वे प्रवासातून कौटुंबिक जिव्हाळा आणि सांस्कृतिक आदान-प्रदान होते. भारतीय रेल्वे हे सगळ्यात विश्वासार्ह आणि सुरक्षित प्रवाससाधन आहे, असे मत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले यांनी व्यक्त केले.
पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर, डॉ. शिरीष यंदे, हेमंत जोगदेव आणि आशिष कुवेलकर तसेच रोहन प्रकाशनचे संस्थापक-संचालक प्रदीप चंपानेरकर उपस्थित होते.
डॉ. केतन गोखले म्हणाले की, भारतातील पहिली प्रवासी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी सुरू झाली. भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वांत मोठी आणि आशियातील सर्वांत मोठी रेल्वेप्रणाली आहे. याची सुरुवात मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे यादरम्यान झाली. त्यानंतर आजपर्यंत भारतीय रेल्वे विभागाने केलेली प्रगती ही अत्यंत कौतुकास्पद आहे.
अतिशय शिस्तबद्ध स्वरूपाची सांकेतिक एकरूपता हे भारतीय रेल्वेच्या कार्यप्रणालीचे वैशिष्ट्य आहे. लहानपणापासून अनेकांना लोको पायलट किंवा टीसी होण्याचे स्वप्न असते. माझेही होते; मात्र मला रेल्वेचा उच्चपदस्थ अधिकारी होण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.
रोहित चंदावरकर म्हणाले की, भारतीय रेल्वे हे एक अफाट असे क्षेत्र आहे, की ज्यामुळे संपूर्ण भारतातील वैविध्यपूर्ण प्रांत एकमेकांशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडले जातात. भारतीय रेल्वे हे असे एकमेव सरकारी कार्यालय आहे, की तिथे जाताना व्यक्तींना आनंद होतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमण चितळे यांनी केले. सूत्रसंचालन ममता क्षेमकल्याणी यांनी केले. आशिष कुवेलकर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.