वालचंदनगर: जंक्शन (ता. इंदापूर) परिसरामध्ये होणाऱ्या एमआयडीसीकरिता महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरीमळ्यातील तब्बल एक हजार एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राला गती प्राप्त होणार असून, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी (दि. 10) झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत इंदापूरकरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. जंक्शनमध्ये औद्यागिक वसाहतनिर्मितीचे स्वप्न राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व इंदापूरचे आमदार व कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाहिले होते. यासाठी भरणे हे अजितदादा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. यापूर्वीच दादांनी जंक्शनच्या एमआयडीसीसाठी 131 हेक्टर जमीन प्रस्तावित केली होती. मात्र, एवढ्याशा जमिनीवर अपेक्षित औद्योगिक वसाहत उभा राहत नसल्याने वाढीव एक हजार एकर जमिनीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, त्या वेळी अजितदादांनी इंदापूरकरांना वाढीव जमीन देण्याचे वचन दिले होते.
उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातामध्ये घेताच सुनेत्रा अजित पवार यांनी इंदापूरकरांचा एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावल्याने दादांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले. एमआयडीसीची माहिती मिळताच जंक्शन परिसरातील उद्योजकांनी आनंद व्यक्त केला. शासनाच्या या निर्णयामुळे इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात होणार आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार
इंदापूरचे आमदार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही या प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्याला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी साथ दिली, तर दादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय प्रक्रियेला वेग दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाठिंबा दिला, मागणी पूर्ण झाल्याबद्दल या सर्वांचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विशेष आभार व्यक्त केले.
या निर्णयामुळे इंदापूरसह बारामती व पुणे जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळणार आहे. हजारो युवकांना रोजगाराच्या संधी, स्थानिक उद्योजकतेला चालना आणि ग््राामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी इंदापूरच्या युवकांच्या हाताला काम देण्याचे पाहिलेले स्वप्न आमच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण होईल, असा विश्वास आहे.दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री