कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवून दोघांना उडविले होते. हा गंभीर प्रकार ताजा असताना अपघातानंतर पालकांनी काही धडा घेतला का नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या विशेष मोहिमेत ११ अल्पवयीन मुले वाहन चालविताना पोलिसांच्या हाती लागली. ते चालवत असलेल्या वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. दि. ९ जुलै रोजी वाहतूक पोलिसांच्या विशेष मोहिमेत अल्पवयीनमुले चालवीत असलेली वाहने आणि परवाने नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये फरासखाना वाहतूक विभागाच्या हद्दीत ४ अल्पवयीन मुले, शिवाजीनगर वाहतूक विभागाच्या हद्दीत १, विमानतळ वाहतूक विभागाच्या हद्दीत २ हांडेवाडी वाहतूक विभागाच्या हद्दीत १, तर लोणी काळभोर वाहतूक विभागाच्या हद्दीत ३ अल्पवयीन मुले वाहने चालविताना पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्या वाहनांवर कारवाई केली.
विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात असून, यामध्ये तब्बल ७३३ वाहनचालकांवर ही कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई हडपसर १२३, येरवडा ५८, लोणीकंद ५३, कोरेगाव पार्क ५१, दत्तवाडी ४३, लोणी काळभोर, सहकारनगर प्रत्येकी ४१, वारजे माळवाडी ४० या ठिकाणी सर्वाधिक परवाना नसताना वाहनचालक वाहतूक पोलिसांना सापडले.
एकीकडे कल्याणीनगर अपघाताचे प्रकरण ताजे आहे. एका अल्पवयीन मुलाच्या वाहन चालविल्यामुळे तीन पिढ्यांना कारागृहाची हवा खावी लागली. तसेच, कायद्यात अल्पवयीन मुलाने अपघात केल्यावर त्याच्या पालकाला जबाबदार धरले जाते. तोच प्रकार या कल्याणीनगर अपघातात पाहयला मिळाला. अशी परिस्थिती समोर असतानादेखील काही पालकांकडून कोणत्याही प्रकारे खबरदारी घेतली जात नसल्याने असे पालक आपल्या पाल्याबाबत हलगर्जीपणाच दाखवत असल्याचे यामुळे निदर्शनास आले आहे. एका दिवसातील अकरा अल्पवयीन मुले वाहने चालवत असल्याचा हा आकडा आहे. रोज शेकडो अल्पवयीन मुले वाहने चालवत आहेत.