लोणी काळभोर: हवेली तालुक्यात अनधिकृत इंग््राजी माध्यम शाळांचे मोठा रॅकेटच सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद ‘यूडीआयएसई’ (णऊखडए) पोर्टलवर वेगळ्याच शाळांमध्ये दाखवून मोठा गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी उघडपणे खेळ केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकरणामुळे शिक्षणव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही ठिकाणी कोणतीही अधिकृत मान्यता नसतानाही शाळा सुरू ठेवून सर्रास फी उकळली जात आहे. शिक्षकांची कमतरता, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि केवळ नावालाच शिक्षण देण्याचा प्रकार सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. काही शाळांनी आवश्यक अटी पूर्ण न करता बनावट किंवा दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर करून मान्यता मिळविल्याचे बोलले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण, सुरक्षित इमारत आणि मूलभूत सुविधा नसतानाही या शाळा बेधडकपणे सुरू असल्याचे वास्तव आहे. काही शाळांमध्ये मान्यता प्रस्ताव अपूर्ण असतानाही वर्षानुवर्षे वर्ग सुरू ठेवले गेले आहेत. विद्यार्थ्यांची नोंद दुसऱ्याच मान्यताप्राप्त शाळेत दाखवून पालकांची फसवणूक होत असल्याचीही चर्चा आहे.
अनेक विद्यार्थ्यांना अधिकृत शालेय कागदपत्रे मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. याचबरोबर, काही शाळांमध्ये ‘यूडीआयएई’ (णऊखडए) पोर्टलवर विद्यार्थ्यांची नावेच नोंदलेली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालक शिक्षणासाठी फी भरत असतानाही ज्या शाळेत मुलं शिकत आहेत, त्या शाळेत त्यांची कोणतीही अधिकृत नोंद नसल्यामुळे ही मुले शासकीय स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती योजना, तसेच ग््रेास मार्क्ससारख्या शैक्षणिक लाभांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
अनधिकृत शाळा निदर्शनास आल्यास त्या त्वरित बंद करण्याचे नियम असतानाही तसेच पुन्हा शाळा सुरू केल्यास दिवसाला 10 हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्षात कारवाई झाल्यानंतर ही दुसऱ्याच दिवशी शाळा पुन्हा सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षण विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचे या अनधिकृत शाळांशी संगनमत असल्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे. तपासणी (इन्स्पेक्शन) होण्याच्या वेळी विद्यार्थ्यांची पळवापळव करून खोटे चित्र निर्माण केले जात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एवढा मोठा प्रकार शक्यच नाही, अशीही जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. हवेली तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील हा प्रकार अत्यंत गंभीर असून, प्रशासन आता तरी जागे होणार का, की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरूच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.