आशिष देशमुख
पुणे: अंगदुखी, थकवा, पायात गोळे येण्याचे प्रमाण वाढले असून, प्रत्येकाला हा त्रास जाणवण्याची वारंवारिता वाढली आहे. याचे कारण हीट स्ट्रेस हेच असून, अल निनो आणि ला निना या चक्राचा या बाबींशी जवळचा संबंध असून, काळजी घेण्याची वेळ आल्याचा इशारा हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे.
पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. साहा आणि डॉ. बी. एन. गोस्वामी यांचा 'रॅपिड इन्क्रीज इन ट्रॉपिकल ह्युमिड हीट स्ट्रेस अँड इट्स प्रेडिक्टेबिलिटी इन वाॅर्मिंग वर्ल्ड' (उष्ण होत चाललेल्या उष्णकटिबंधीय आर्द्र उष्णतेच्या ताणात होणारी जलद वाढ आणि त्याचे पूर्वानुमान) हा शोधनिबंध जर्नल ऑफ जिओग्राफिकल रिसर्चमध्ये प्रसिद्ध झाला. यामध्ये उष्णतेच्या वाढीमुळे देशातील क्रयशक्ती आणि पर्यायाने देशाच्या एकूण उत्पादकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
शास्त्रज्ञांचे महत्त्वाचे निष्कर्ष
अल निनो आणि ला निना या चक्राचा दमट उष्णता-उत्पादकता नुकसानीशी मजबूत संबंध आढळला आहे.
अशा परिस्थितीचा अंदाज १ ते ६ महिने आधी घेता येणे शक्य आहे.
कामाच्या वेळांचे नियोजन, उष्णता कृती आराखडे, कामगारांच्या सुरक्षेसाठी पूर्वतयारी करता येऊ शकते.
जग अधिक उष्ण आणि अधिक दमट होत गेले तर केवळ आरोग्यच नव्हे, तर कामगारांची शारीरिक क्षमता, कामाचे तास, उत्पादकता आणि आर्थिक वाढ, यांनाही मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हवामानबदल रोखण्याबरोबरच उष्णतेशी जुळवून घेण्याच्या उपाययोजनांना तितकेच महत्त्व देण्याची गरज आहे.
भारतात आर्द्र उष्णतेचा ताण (ह्युमिड हीट स्ट्रेस) वाढून तो जागतिक स्तरावर एका गंभीर केंद्रबिंदूच्या स्थितीत पोहोचला आहे.
असा इशारा ‘आयआयटीएम’च्या एका नवीन अभ्यासातून देण्यात आला आहे.