Heavy rains causing diarrhea and loose motions in children
पुणे: शहरात पावसाळ्याची तीव्रता वाढत असतानाच जलजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. अतिसार, जुलाब, ताप, उलट्या आणि पाण्यामुळे पसरणार्या संसर्गजन्य आजारांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत चिंता व्यक्त केली असून, नागरिकांनी स्वच्छता आणि सुरक्षित पाण्याच्या वापरासंबंधी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यांत शहरातील विविध दवाखान्यांत सुमारे 450 पेक्षा अधिक रुग्णांनी अतिसार, जुलाब आणि पचनाशी संबंधित तक्रारींसाठी उपचार घेतले आहेत. त्यात लहान मुलांचे प्रमाण अधिक असून, अनेक रुग्णांना ताप व अशक्तपणाही जाणवत आहे. (Latest Pune News)
दूषित पाणी, उघड्यावर मिळणारे अन्न आणि पावसामुळे साचलेले पाणी या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरत आहेत. विशेषतः झोपडपट्ट्या आणि गर्दीची ठिकाणे असलेल्या भागांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवले गेले आहे. शाळकरी मुलांमध्येही या आजारांचे प्रमाण वाढत आहे.
दरम्यान, महापालिकेने प्रतिबंधात्मक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. संभाव्य साथीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांत अतिरिक्त औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नागरिकांनी ताजे अन्न खावे, दूषित पाणी टाळावे, कोणताही त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहेत लक्षणे ?
दिवसातून अनेकदा सैल मल (द्रव स्वरूपात) होणे
पोटात मुरडा, दुखणे किंवा गडगडाट
उलटी, मळमळ
ताप आणि अशक्तपणा
शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन), तोंड कोरडे पडणे, डोळे खोल जाणे
काय काळजी घ्यावी?
उकळून थंड केलेले किंवा फिल्टर केलेले पाणी पिणे
बाहेरचे अन्न टाळणे, विशेषतः उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ
हात धुण्याची सवय अंगीकारणे - जेवणापूर्वी आणि शौचालयानंतर
लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे
डिहायड्रेशनची लक्षणे आढळल्यास ओआरएस घालून पाणी वारंवार पिणे
लहान मुलांचे विशेष लक्ष ठेवणे - त्यांना स्वच्छ, पोषणयुक्त आहार देणे