Mula Mutha Pollution Pudhari
पुणे

Mula Mutha Pollution: मुळा-मुठा नदी प्रदूषणाचा फटका; हवेलीतील शेती नापीक होण्याच्या मार्गावर

दूषित पाण्यामुळे पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्यावर परिणाम; शेतकऱ्यांची तीव्र नाराजी

पुढारी वृत्तसेवा

वाघोली: मुळा-मुठा नदीत प्रक्रिया न करता सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे हवेली तालुक्यातील शेतीवर परिणाम होत आहे. सांडपाणी आणि रसायनमिश्रित पाण्यामुळे परिसरातील शेतजमीन नापीक होत आहे. पिकांची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. विषारी पाणी जमिनीत झिरपल्याने विहिरी आणि बोअरवेल्सचे पाणी दूषित झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

हवेली तालुक्यातील तेवीसहून अधिक गावांतील शेतीला मुळा-मुठा नदीतील दूषित पाण्याचा फटका बसत आहे. सांडपाणी आणि रसायनमिश्रित पाण्याचे दूरगामी परिणाम आता दिसू लागले असून, शेतजमीन नापीक होत आहे. तसेच, पिकांची वाढ देखील खुंटत आहे. शेतीच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. प्रदूषित पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रचंड प्रमाण देखील वाढले आहे. एकीकडे शेतकऱ्यांना विषारी पाणी मिळत असताना दुसरीकडे पाटबंधारे विभाग त्यांच्या कूपनलिकांवर ‌‘वॉटर मीटर‌’ बसवून पाणीपट्टी वसूल करीत आहे. ‌‘घाण पाणी द्यायचे आणि वरून पैसेही वसूल करायचे,‌’ अशा शब्दांत या गावांतील शेतकरी संताप करीत आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुळा-मुठा नदीतील प्रदूषणाची पातळी धोक्याच्या पातळीच्या पलिकडे गेल्याचे नमूद केले आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका यावर ठोस उपाययोजना करताना दिसत नसल्याने या गावांतील ग््राामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रश्नाबाबत आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी विधानसभेत नुकतीच लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महापालिकांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

दरम्यान, सांडपाणी प्रक्रिया क्षमता वाढविण्यासाठी जायकाच्या सहकार्याने नवीन प्रकल्प राबविले जात असून, ते 2026 पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होत असून, या सांडपाण्यापैकी 6.20 टीएमसीवर प्रक्रिया केली जाते. उर्वरित सांडपाणी थेट मुळा-मुठा नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषित होत आहे. नियमांनुसार सांडपाण्यावर पूर्ण प्रक्रिया करूनच ते नैसर्गिक प्रवाहात सोडणे बंधनकारक आहे; अन्यथा दुप्पट दराने आकारणीसह दंडाची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेला सूचना देण्यात येत असल्याचेही विखे-पाटील यांनी अधिवेशनात सांगितले आहे.

जलप्रदूषणामुळे बाधित गावे

हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी, भवरापूर, अष्टापूर, शिंदेवाडी, शिरसवाडी, बिवरी, वाडेबोल्हाई, पेठनायगाव, थेऊर, मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द, प्रयागधाम, कोलवडी साष्टे, केसनंद, आव्हाळवाडी यांसह अनेक गावांतील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जलप्रदूषणाचा फटका बसत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते मुळा-मुठा नदीत सोडत आहेत. तसेच परिसरातील उद्यागाचे रसायनमिश्रित पाणीही नदीपात्रात सोडले जात असल्याने शेतीचे उत्पादन घटले आहे असून, जमिनीची गुणवत्ता कमी झाली आहे. नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी शुद्ध पाणीही मिळत नाही. प्रशासनाने जलप्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
अशोक आव्हाळे, शेतकरी, मांजरी खुर्द
मुळा-मुठा नदीतील जलप्रदूषणाचा फटका हवेली तालुक्यातील तेवीसहून अधिक गावांना बसत असून, शेकडो हेक्टर शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. या प्रश्नावर नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडली. हा प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात देखील पाठपुरावा करणार आहे.
ज्ञानेश्वर कटके, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT