शंकर कवडे
पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डाच्या सुरक्षेवर बाजार समितीकडून लाखो रुपये खर्च केले जात असतानाही गूळ-भुसार बाजारात सुटीच्या दिवशी सुरक्षेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. बाजार बंद असताना आवाराच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक काटेकोरपणे पार पाडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र याच दिवशी सुरक्षारक्षक जागेवर दिसत नसल्याने बाजार आवाराला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुरक्षेअभावी व्यापाऱ्यांचे आवार क्रीडांगण, वाहनांचे वॉशिंग सेंटर आणि नशेखोरांचा अड्डा बनत असून, भुरट्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमध्येही नाराजी वाढली आहे. साप्ताहिक तसेच अन्य सुट्ट्यांच्या दिवशी गूळ-भुसार बाजारातील व्यवहार पूर्णपणे बंद असतात. मात्र, याच काळात बाहेरील नागरिकांचा बाजार आवारात मुक्त वावर सुरू असतो. मोकळ्या जागांवर क्रिकेट, फुटबॉलसह विविध खेळ खेळले जात आहेत.
नागरिकांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची असताना व्यापाऱ्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी असलेले बाजार आवारच क्रीडांगण कसे बनले, असा सवाल बाजार घटकांकडून केला जात आहे. खेळादरम्यान व्यापाऱ्यांनी लावलेल्या फलकांचे नुकसान होत असल्याच्याही तक्रारी आहेत.
बाजारातील पिण्याच्या पाणपोईची अवस्थाही वेगळी नाही. नागरिकांसाठी असलेल्या पाण्याचा वापर दुचाकी आणि तीनचाकी वाहने धुण्यासाठी सर्रास केला जात आहे. मोकळ्या जागांसह उभ्या वाहनांच्या आडोशाला नशा करण्याचे प्रकारही वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी बाजार आवारात चोरीच्या घटना घडूनही सुरक्षा व्यवस्थेत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे सुरक्षेवर लाखो रुपये खर्च होत असतील, तर प्रत्यक्षात सुरक्षा नेमकी कुठे आहे आणि या खर्चाचा फायदा कोणाला होतो, असा संतप्त सवाल बाजार घटकांकडून उपस्थित होत आहे.
सुटीच्या दिवशी बाजार आवारात सुरक्षारक्षकांची उपस्थिती तसेच बाहेरील व्यक्तींचा वावर याबाबत तातडीने माहिती घेतली जाईल. बाजार आवारात खेळ खेळणे, पाणपोईवर वाहने धुणे अथवा नशा करण्यासारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. सुरक्षा विभागाला याबाबत स्पष्ट सूचना देऊन गस्त आणि देखरेख वाढविण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती