पुणेः मैत्रिणीवरून वाद झाल्याने मित्रानेच मित्राचा आपल्या साथीदारांना सोबत घेऊन लाकडी दांडके, बॅटने मारहाण करून खून केल्याची घटना गोखलेनगर येथे घडली आहे. याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी तिघा आरोपींना नवी मुंबई येथील रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बारा तासांच्या आत ताब्यात घेतले आहे.
हर्षद मच्छिंद्र जाधव (वय 20, रा. शकुंतला गार्डनशेजारी, गोखलेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर अभिषेक संतोष पवार (वय 20), प्रथमेश धोत्रे (वय 21) आणि मारुती देवकर (वय 28, राहणार तिघे जनवाडी) अशी तिघा आरोपींची नावे आहेत.
ही घटना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एकतानगर सोसायटी, भगवान चाळ, गोखलेनगर येथे घडली आहे. याबाबत हर्षद याची आई पौर्णिमा जाधव (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत यांनी सांगितले, हर्षद आणि आरोपी अभिषेक पवार हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. हर्षद याचा एक मित्र असून, त्याची एक मैत्रीण आहे. त्या मैत्रिणीवरून अभिषेक आणि हर्षद या दोघांत गेल्या काही महिन्यांत वाद झाले होते. हर्षद याने अभिषेक याच्या घरी जाऊन गोंधळ घातला होता.
तसेच त्याला पाहून घेण्याची धमकी दिली होती. त्यामळे अभिषेक हा हर्षद याच्यावर चिडून होता. त्याच कारणातून त्याने आपल्या इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन हर्षद याला गुरुवारी (दि.18) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गाठले. त्यावेळी हर्षद हा आपल्या घरासमोरील एका रिक्षात मोबाईल पाहात बसला होता.
तिघांनी त्याला लाकडी दांडके आणि बॅटने बेदम मारहाण केली. हर्षद याचा मित्र यश याने त्याच्या कुटुंबीयांना ही माहिती दिली. हर्षदच्या कुटुंबीयांनी बाहेर धाव घेतली. त्याच्या आई-वडिलांनी पाहिले असता, हर्षद हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेला होता. तेवढ्यात पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले होते.
त्यांनी हर्षद याला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या डोक्यात आरोपींनी मारहाण केली होती. हर्षद याच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी पुण्यातून पळ काढला होता. चतुःश्रृंगी पोलिस, गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेत होती.
अखेर चतुःश्रृंगी पोलिसांना हे तिघे नवी मुंबई येथील रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिघांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त चुलमूला रजनीकांत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तमकुमार भजनावळे, गुन्हे निरीक्षक स्नेहल पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने केली.