ओतूर : पुढारी वृत्तसेवा : नगर-कल्याण महामार्गावरील खामुंडी (ता.जुन्नर) ते बदगी (ता.अकोले)चे घाटात रविवारी (दि.14) रात्री शंभर फूट खोल दरीत कोसळलेल्या दुचाकीस्वार पिता-पुत्राचे प्राण खामुंडी येथील युवकांनी केलेल्या तत्पर मदतीमुळे वाचले आहेत.बाळासाहेब शिवाजी मातेले त्यांचा मुलगा मयूर (रा. काळेवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे प्राण वाचलेल्या जखमी दुचाकीस्वारांचे नाव आहे.
चोहोबाजूंनी किरर्र दाट झाडी,कमालीचा काळोख,रस्त्यावर अनेक किलोमीटरपर्यंत चिटपाखरूदेखील नाही, बिबटे आणि अन्य वन्य प्राण्यांची वर्दळ असा हा घाट व घाटाची अतितीव्र उतारांची वळणे,जागोजागी संरक्षक कठडे नसलेल्या खामुंडी ते बदगी या मार्गावरील घाटात थंडीने कुडकुडत हे दोघे दुचाकीस्वार बदगीहून कामानिमित्त खामुंडीकडे जात असताना एका क्षणी अचानक बदगीच्या घाटात वळणावर तीव्र उताराचा अंदाज न आल्यामुळे ते सुमारे 100 फूट खोल दरीत दुचाकीसह कोसळले व गंभीररीत्या जखमी झाले.
या अपघाताबाबत पिंपरी पेंढार गावचे पोलिस पाटील संकेत जोरी यांनी खामुंडी येथील समाजसेवक व पत्रकार कैलास बोडके यांच्याशी संपर्क करून त्यांना माहिती देत मदत करण्यास सांगितले. कैलास बोडके यांनी अत्यंत जलदगतीने हालचाल करून खामुंडी येथील अक्षय जाधव,कृणाल डुंबरे, नवाज पिरजादे, बाळासाहेब शिंगोटे,प्रसाद शिंगोटे, अक्षय बोडके,अक्षय शिंगोटे,पवन शिंदे, तेजस शिंदे, कृषिकेश बोडके,गौरव गंभीर, प्रवीण शिंगोटे, विघ्नेश बोडके,हेमंत बोडके या तरुणांसह घाटाच्या दिशेने दुचाकी सुसाट सोडल्या व घटनास्थळ गाठून जखमींना ताब्यात घेतले, तोपर्यंत पोलिस पाटील जोरी हे रुग्णवाहिका घेऊन हजर झालेच होते. सर्व तरुणांनी घाटातील दरीत कोसळलेल्या दुचाकीस्वारांना विजेरीच्या साहाय्याने शोधून रस्त्यावर आणले व तातडीने रुग्णवाहिकेतून एकास आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात तर दुसर्या जखमीला पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. हे दोघेही सुखरूप आहेत.
या दोघांना रात्रीच्या वेळी दाट झाडीतून व काळोखात मदत करणार्या खामुंडीतील सर्व तरुणांचे धाडस हे नक्कीच कौतुकास्पद असल्याने पंचक्रोशीत व अकोले तालुक्यातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. बिबटप्रवण क्षेत्रात असलेल्या बदगी घाटातील कोणत्याही क्षणी वन्यप्राण्याचा हल्ला होऊ शकतो, अशा परिस्थितीत कैलास बोडके व त्यांच्या इतर सहकार्यांनी दाखवलेले प्रसंगावधान हे गौरवास पात्र आहे. कैलास बोडके व मित्रमंडळ यांनी अनेकदा नगर-कल्याण महामार्गावर व बदगीच्या घाटात संकटसमयी तात्काळ मदतीसाठी धावून जात माणुसकी जपलेली आहे हे सर्वज्ञात आहे.
हेही वाचा