पुणे

खडकवासला धरण तीरावर कचर्‍याचे ढिग

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पुणे शहर व परिसराची तहान भागवणार्‍या खडकवासला धरणाच्या दोन्ही तीरांवर राडारोड्याचे ढिगारे पडले आहेत. तीरावरील पुणे -पानशेत व एनडीए -बहुली रस्त्यांचे कचरा डेपो झाले आहेत. धरणासह मुठा नदीत राजरोसपणे सांडपाणी, मैलापाण्यासह कचरा मिसळत असल्याचे वांरवार पुढे आले आहे. असे असतानाही प्रशासन कागदी घोडे नाचवत आहेत. सर्वात गंभीर स्थिती पुणे-पानशेत रस्त्याची आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गोर्‍हे, डोणजेपासून खानापूर, मणेरवाडी ते थेट पानशेत वरसगाव धरणापर्यंत सडलेल्या कचर्‍याचे ढिग साठले आहेत.

संबंधित बातम्या :

या परिसरात पर्यटन वाढले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, तसेच धरणतीरावर हॉटेल, फार्महाऊस, रिसॉर्टचे मोठे जाळे पसरले आहे. सडलेले मांस, अन्न, कचरा पोत्यांत भरून रातोरात रस्त्यावर तसेच धरण तीरावरील ओढ्या-नाल्यांत टाकला जात आहे. आमदार भीमराव तापकीर यांनी धरणातील पाण्याच्या प्रदुषणाकडे थेट विधीमंडळात सरकारचे लक्ष वेधले होते. मात्र. अद्यापही वरवर पाहणी करण्याशिवाय कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. उलट प्रशासनाच्या उदासिनतेमुळे कचर्‍याचे ढिग वाढले असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. सांडपाण्यासह आता सडलेला कचराही पाण्यात येऊ लागला आहे.

निसर्गाचे वरदान लाभलेल्या या परिसरातील रस्त्यांना कचर्‍यामुळे अवकाळा आली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात; अन्यथा या परिसराला बकालपणा प्राप्त होईल.
                                 – गणेश जागडे, उपाध्यक्ष, वेल्हे तालुका युवक काँग्रेस.

सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणार्‍यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कचर्‍याची समस्या गंभीर बनली आहे.
                                                     -शरद जावळकर, सरपंच, खानापूर.

SCROLL FOR NEXT