सासवड: किल्ले पुरंदर परिसरात दमदार पाऊस झाल्याने घोरवडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुरंदर तालुक्यातील चार धरणे फुल्ल झाली असून, पिण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. घोरवडी धरणाची एकूण साठवण क्षमता 67.50 दशलक्ष घनफूट इतकी असून, सद्य:स्थितीला तलावामध्ये 45 टक्के पाणीसाठा असल्याचे गराडे पाटबंधारे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी सांगितले.
घोरवडी धरणातून सासवड शहराला पिण्याच्या पाण्याची योजना तसेच सुपे-घोरवडी, शिवतारे वस्ती, चव्हाण वस्ती, पिंपळे, पोमणनगर, दातेमळा, भिवडी याठिकाणी पाणीपुरवठा योजना सुरू आहे. या धरणातून दिवे प्रादेशिक योजना आहे, परंतु पाइप फुटीमुळे ही योजना बंद स्थितीत आहे. सध्या या धरणावर परिसरातील 55 हेक्टर इतके क्षेत्र सिंचित होते. (Latest Pune News)
मागील वर्षी जून महिन्यात घोरवडी धरणात मृतसाठा होता. या वर्षी तालुक्यातील अनेक भागात दमदार मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. मागील वर्षाच्या तुलनेत किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. पुढील सहा महिने आसपासच्या गावांना पाण्याची टंचाई भासणार नाही. सध्या धरणात 45 टक्के साठा शिल्लक असल्याचे सासवड पाटबंधारे शाखेचे संदेशक एस. एच. कोरपडे यांनी सांगितले.
सासवड शहराला घोरवडी आणि वीर धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. धरणातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन सुरू आहे. सासवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद