परिंचे: पुरंदर तालुक्यात धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांमुळे वर्षभर भाविक व पर्यटकांची मोठी वर्दळ असते. भाविक आणि पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीमुळे तालुक्यातील हॉटेल, वडापाव, मिसळ तसेच अल्पोपहार केंद्रांचा व्यवसाय तेजीत आहे.
मात्र, काही ठिकाणी स्वच्छतेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, हात धुण्याची सुविधा आणि स्वच्छ परिसराचा अभाव असल्याचा आरोप केला जात असून, अस्वच्छ वातावरणात अन्न तयार व विक्री होत असल्याने ग्राहकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
श्रीक्षेत्र जेजुरी येथे खंडोबा दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने येतात. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या पुरंदर किल्ल्यासह श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान आणि नारायणपूर येथील दत्त महाराजांच्या दर्शनासाठीही दररोज भाविकांची गर्दी होत असते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त सासवड परिसरात लाखो वारकरी येणार आहेत. त्यापूर्वी पुरंदर तालुक्यातील लहान-मोठी हॉटेल्स, वडापाव, मिसळ तसेच अल्पोपहार केंद्रांची अन्नसुरक्षा विभागाने सखोल तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
काही ठिकाणी अस्वच्छ स्वयंपाकगृहे, कामगारांच्या स्वच्छतेचा अभाव, तसेच ग्राहकांसाठी पिण्याचे पाणी व हात धुण्याच्या सुविधांचा अभाव असल्याचे सांगितले जात आहे. काही हॉटेलमध्ये ग्राहकांना पाण्याचा जग व ग्लास न देता बाटलीबंद पाणी खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचाही आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
तपासण्यांच्या प्रभावीतेबाबत नागरिकांचा सवाल
अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाच्या तपासण्या प्रत्यक्षात किती प्रभावी आहेत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. नियमित तपासण्या होत असतील, तर अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार का समोर येतात, संबंधित यंत्रणा केवळ कागदोपत्री तपासण्यांपुरतीच मर्यादित आहे का, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
संपूर्ण पुरंदर तालुक्यात अन्नसुरक्षा यंत्रणेने विशेष तपासणी मोहीम राबवावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच, प्रत्येक खाद्यपदार्थ विक्री केंद्रात स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा सक्तीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक जितेंद्र जगताप यांनी सांगितले.