Flood situation in Maharashtra under control
पुणे: राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर कायम असून, या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या बचावकार्यासाठी सज्ज आहेत.
इशारा पातळीच्या वर गेलेल्या धरणातील विसर्ग वाढवायचा की नाही, याबाबत शेजारील राज्यांकडून चांगले सहकार्य मिळत आहे. या राज्यांसोबत सातत्याने चर्चा सुरू आहे, असे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीच्या परिस्थितीबाबत सांगितले. (Latest Pune News)
बाणेरमधील बंटारा भवनात आयोजित एमकेसीएलच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, राज्यातील 14 लाख एकर जमिनीवरील पिके या अतिवृष्टीमुळे नष्ट झाली आहेत. पंचनामे झाल्यावरच मदत देता येते. त्यामुळे तातडीने बाधित ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काल, परवा आणि मागील आठवडयात अशा चार दिवसांत पाऊस झाला म्हणून मदत देता येत नाही. याउलट मागणी न करता शासनाने मदतीसाठी पाऊल उचलले आहे.
मुख्यमंत्र्यांची गरज पडणार नाही
पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये विसर्जन मिरवणुकीवरून वाद सुरू आहे. मंडळांमध्ये एकवाक्यता होत नाही. याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले की, पुण्याच्या गणेशोत्सवात दरवर्षी असे प्रश्न निर्माण होत असतात. पुणेकर आणि पोलिस प्रशासन मिळून हे प्रश्न सोडवतील. आजवर मुख्यमंत्र्यांना पुण्याच्या गणेशोत्सवाच्या प्रश्नात लक्ष घालावे लागले नाही अन् पुढेही मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची गरज नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पुराव्याशिवाय आरोप करू नये; रोहित पवारांना मुख्यमंत्र्यांचा टोला
आमदार रोहित पवारांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर सिडकोतील भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, रोहित पवारांनी पुरावे नसताना आरोप करू नये. पुराव्याशिवाय केलेल्या आरोपांना काही अर्थ नसतो. पुरावे असतील तर तितक्याच ताकदीने उत्तर देता येते, असा टोलादेखील त्यांनी लगावला.