वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : वाल्हे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीने 21 वर्षांपूर्वी भंगारात काढलेल्या 20 हजार लिटरच्या प्लास्टिक टाकीची तेव्हापासून विल्हेवाट न लावल्याने अखेर शुक्रवारी या टाकीला आग लागून ती भस्मसात झाली.येथील शहीद शंकर शिंदे चौकाजवळ ओढ्यालगतच्या विद्युत रोहित्राजवळच्या मोकळ्या जागेत ही टाकी पडून होती. या प्लास्टिक टाकीला सकाळी अचानक आग लागून या आगीने रौद्र रूप धारण केल्याने क्षणार्धातच प्लास्टिकच्या टाकीची राखरांगोळी झाली. आगीने परिसरात मोठ्याप्रमाणावर धुराचे लोट पसरले होते. दूरवरच्या पालखी महामार्गावरूनही या काळ्या धुराचे लोट दिसत होते. यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती.
मागील महिन्यातच वाल्हेच्या मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी राजकिशोर व राजगोपाल काबरा यांच्या राहत्या घरासह दुकानाला प्रचंड आग लागल्याची घटना घडली होती. यामुळे ग्रामस्थांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. वाल्हे गावचे माजी सरपंच अमोल खवले यांनी सांगितले की, जळालेली प्लास्टिकची टाकी 21 वर्षांपूर्वीची आहे. तिचा भंगारात लिलाव होणार होता, मात्र काही तांत्रिक अडचणीमळे लिलाव रखडला होता. ओढ्यालगत झालेल्या कचराकुंडीला आग लागल्याने टाकी जळाली असावी. ओढ्यावर नव्याने पूल बांधताना ओढा सफाई करण्यात आल्याने या ठिकाणी कचर्याचे प्रमाण अत्यल्प असूनही मोकळ्या जागेत भीषण आग लागतेच कशी ? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.
हेही वाचा :