पुणे : ‘शुभमंगल सावधान’ म्हणत आयुष्याच्या नव्या टप्प्यावर पाऊल ठेवणाऱ्या वधू-वरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाखो रुपयांचा चुना लावणारे ‘मॅट्रिमोनिअल रॅकेट’ पुण्यात उघडकीस आले आहे. मुलांना स्थळ शोधणाऱ्या पालकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर मूळ प्रोफाइलमध्ये छेडछाड करून नावे आणि जात बदलून त्याच प्रोफाइल्स वेगवेगळ्या कुटुंबांना विकायच्या, असा धक्कादायक प्रकार काही फसव्या विवाह मंडळाकडून सुरू होता. याबाबत फिर्यादीच्या अथक प्रयत्नानंतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, राज्यातील सर्वच वधू-वर सूचक मंडळे पोलिसांच्या रडारवर येणार आहेत.(Latest Pune News)
विवाहासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक विषयात पुणेकरांना टार्गेट करणाऱ्या या मंडळाच्या प्रतिभा योगेश तरसे (स्वाधर्ती, धन रो हाऊस, रोहिणीनगर, पंचवटी, नाशिक), विद्या देशपांडे आणि नीलेश केशव वऱ्हाडे (रा. श्री दत्त रो हाऊस नाशिक) अशा तिघांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पीडित नागरिकाने तब्बल सात ते आठ महिने पाठपुरावा केल्यानंतर आणि राज्य महिला आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन अहवाल मागवल्यानंतर अखेर पोलिसांना गुन्हा दाखल करणे भाग पडले आहे.
याबाबत ॲड. राजेश रामचंद्र बेल्हेकर (वय 61, रा. महर्षिनगर, पुणे) यांनी याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार राजेश बेल्हेकर हे त्यांच्या मुलाच्या विवाहासाठी मुलगी शोधत होते. 9 मार्च 2025 रोजी त्यांना ‘शुभऋषी विवाह मंडळा’ची जाहिरात दिसली. त्यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. सुरुवातीला मंडळाकडून सासवड (जि. पुणे) येथील एका मराठा वधूची माहिती फोटोसह पाठविण्यात आली. बेल्हेकर यांनी आपल्या मुलाचा फोटो आणि माहिती पाठविल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी मुलीकडील पसंत असल्याचा संदेश आला आणि मंडळाची वेबसाईट व संपर्क साधण्यासाठी 3 हजार 500 रुपये वार्षिक वर्गणी ‘गुगल पे’ किंवा ‘फोन पे’द्वारे भरण्यास सांगण्यात आले.
बेल्हेकर यांनी काही दिवस विचार करून हा विषय बाजूला ठेवला. मात्र, 2 एप्रिल 2025 रोजी त्यांना याच मंडळाची दुसरी जाहिरात दिसली आणि त्यांनी दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. हा नंबर विद्या देशपांडे यांचा असल्याचे समजले. विद्या देशपांडे यांनी सुरुवातीला दौंड येथील एका वधूची माहिती पाठवून बेल्हेकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, 3 एप्रिल रोजी त्यांनी कात्रज (पुणे) येथील दोन वधूंची माहिती पाठवली आणि वार्षिक वर्गणीची रक्कम 3 हजार 500 ऐवजी 3 हजार रुपये भरण्यास सांगितली.
पैसे भरल्यानंतर विद्या देशपांडे यांनी सर्व पाचही वधूंचे पत्ते आणि संपर्क क्रमांक देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तगादा लावल्यानंतर त्यांनी दौंड आणि कात्रज येथील दोन वधूंच्या आईचे पत्ते आणि फोन नंबर दिले. धायरी येथील एका वधूचा पत्ता व फोन नंबर तर खोटा असल्याचे नंतर उघड झाले, तर उर्वरित दोन वधूंचे पत्ते देण्यास त्यांनी शेवटपर्यंत टाळाटाळ केली. याव्यतिरिक्त, मंडळाकडून आलेल्या मेसेजमध्ये एका वधूकडून नकार आल्याचे खोटे कळवण्यात आले. तर पूर्वी त्याच वधूकडून पसंती दर्शवण्यात आली होती. तक्रारदारांच्या सात ते आठ महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाह मंडळांचे संगनमत आहे. दोन विवाह मंडळांशी संपर्क साधल्यानंतर मला ज्या मुलींचे प्रोफाईल पाठविण्यात आले. त्यांचे फोटो तेच, पण नावे वेगवेगळी असल्याच्या प्रकाराने धक्काच बसला. त्यामुळे याप्रकरणात खोलाशी जाण्याचे ठरविल्यानंतर विवाह मंडळांकडून फसवणूक झाल्याचे समजले. काही वधू-वर सूचक मंडळांकडून कमालीची आर्थिक फसवणूक, बनावट फोटो, बनावट प्रोफाइल्स तयार करणारे रॅकेट आहे. या सर्व विवाह मंडळांना कायदा व नियमांच्या कक्षेत आणले पाहिजे. राज्य महिला आयोगाने माझ्या तक्रारीचे गांभीर्य ओळखल्याने मी त्यांचे आभार मानतो.राजेश बेल्हेकर, पीडित नागरिक