राज्यातील धरणसाठा 88 टक्के; सर्व धरणे ‘हाऊसफुल्ल’ Pudhari Photo
पुणे

Maharashtra Dams: राज्यातील धरणसाठा 88 टक्के; सर्व धरणे ‘हाऊसफुल्ल’

मागील वर्षापेक्षा सुमारे 15 टक्क्यांनी जास्त

शिवाजी शिंदे

Pune Rains: पावसाळ्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Rain) बरसल्यामुळे राज्याच्या विविध भागांत असलेली धरणे तुडुंब भरली आहेत. दरम्यान, राज्यातून मान्सून माघारी फिरला असला, तरी अवकाळी पावसाची अजूनही जोरदार हजेरी लागत आहे. त्यामुळे धरणांमध्ये अतिरिक्त झालेला पाणीसाठ्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

सध्या राज्यातील 2 हजार 997 धरणांमध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत 88.17 टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 15 टक्क्यांनी हा पाणीसाठा जास्त आहे. मागील वर्षी याच दिवसांत 73.92 टक्के पाणीसाठा होता.

राज्यात जलसंपदा विभागाचे सहा विभाग आहेत. या सहा विभागांत मोठी, मध्यम आणि लहान अशी मिळून 2 हजार 997 धरणे आहेत. यावर्षी कोकणपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विभागांत जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. (Maharashtra Rain News)

ऑगस्ट महिन्यात सलग पाऊस पडल्यामुळे कायमच पर्जन्यछायेखाली असलेल्या मराठवाडा भागातील सर्वच जिल्ह्यांत एवढा पाऊस पडला की या भागात असलेली सर्वच धरणे तुंडुंब भरली आहेत.

राज्यातील सहा विभागांपैकी सर्वांत जास्त पाऊस कोकण भागात पडला आहे. त्यामुळे कोकणातील 537 धरणांमध्ये सध्या 94.13 टक्के एवढा पाणीसाठा आहे. ऑक्टोबर महिन्यात याच दिवसांत मागील वर्षी 93.20 टक्के एवढा पाणीसाठा होता.

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागात इतर विभागांच्या तुलनेत सर्वांत जास्त धरणे असून, त्याची संख्या 920 एवढी आहे. या विभागात सध्या 78.57 टक्के एवढा पाणीसाठा आहे. मागील वर्षी 39.16 टक्के एवढा पाणीसाठा होता. म्हणजेच, मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 टक्क्यांनी पाणीसाठा जास्त आहे. या विभागात बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, धाराशिव, परभणी हे जिल्हे समाविष्ट आहेत.

नाशिक (Nashik) विभागात सर्व प्रकारची मिळून 524 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये सध्या 86 टक्के एवढा पाणीसाठा आहे. मागील वर्षी 76.09 टक्के एवढा पाणीसाठा होता. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे चार टक्क्यांनी पाणीसाठा जास्त आहे.

पुणे विभागात 720 लहान-मोठी धरणे आहेत. या विभागात सध्या 91.86 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी 79.42 टक्के एवढा पाणीसाठा होता. मागील वर्षापेक्षा 13 टक्क्यांनी पाणीसाठा जास्त आहे.

पुणे (Pune) विभागातील पुण्यासह सातारा (Satara) आणि कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यांत घाटमाथ्याच्या जास्त भागाचा समावेश होत आहे. परिणामी, या विभागात पावसाळ्याच्या दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टी या प्रकारात पाऊस पडत असतो. त्यामुळे या भागात असलेल्या धरणांमध्ये कायमच पाणीसाठा जास्त होत असतो. परिणामी, धरणामधील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT