देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : वाढता उन्हाचा पारा आणि पाण्याच्या पातळीत होणारी घट यामुळे इंद्रायणी नदीतील महाशीर अर्थात देव माशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
इंद्रायणी नदीतील महाशीर माशांचे अस्तित्व 1980 च्या सुमारास संपले होते. त्यानंतर साडेतीन वर्षांपूर्वी तळेगाव येथील एका संस्थेने महाशीर माशांचे प्रजनन करण्याचे ठरविले. पाण्यात मत्स्यबीज सोडण्यात आले.
त्याला जपले व सहा महिन्यानंतर त्यांना मुक्त संचार करू दिला; पण अचानक पाण्यात बदल झाल्यामुळे महाशीर मासे हजारोच्या संख्येने मृत्यू पावले.
या घटनेनंतर माशांची अधिक काळजी घेतली जाऊ लागली होती. येथे मच्छीमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अनेक प्राणी रक्षक सकाळी येथे माशांना खाद्य देत असत.
मात्र, पुन्हा एकदा मृत मासे आढळून येऊ लागल्यामुळे मासे नक्की कशामुळे मृत्यू पावले हे गुढ उकलू शकले नाही. ग्रामस्थ महेश मोरे यांना मृत मासे आढळले. त्यांची संख्या सुमारे शंभरच्या आसपास असण्याचा अंदाज आहे.
मावळातील अनेक कंपन्या सांडपाणी नदीत सोडत आहेत. देहू गावात अनेक सोसायट्या झाल्या आहेत. या सोसायट्यांचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे.
कडक उन्हामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असते. त्यात दूषित पाणी मिसळल्यामुळे हे पाणी धोकादायक बनते, अशी माहिती महेश मोरे यांनी दिली.