पांढरेवाडी: दौंड तालुक्यात मान्सूनने हजेरी लावली असली, तरी पेरणीसाठी आवश्यक असलेल्या दमदार पाऊस अद्यापही पडला नाही. सध्या तालुक्यात होत असलेल्या हलक्या सरींच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यात फक्त १९ टक्के खरिपाची पेरणी झालेली आहे.
सध्या जुलै महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला तरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून महिन्यात तालुक्यात सरासरी ९५.५ मिमी. पावसाची नोंद होते. यंदा मात्र ४३.०९ मिमी. पाऊस झाला आहे. तर, जुलै महिन्याचे ६४.५ मिमी. पर्जन्यमान असून, या महिन्यातील चार दिवसांत अवघा ५.८ मिमी. पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. आजपर्यंत दौंड तालुक्यात अवघी १९ टक्के खरीप पेरणी झाली आहे. शेतकरी अजूनही दमदार आणि पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दौंड तालुक्यात ऊस लागवडीचे क्षेत्र सोडून खरिपासाठी सरासरी ६ हजार १३१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ११९ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या विविध पिकांची पेरणी झाली आहे.
दौंड तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने अवघी १९ टक्के पेरणी झाली आहे. शेतकरी बांधवांनी १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय तसेच जमिनीची वाफसा स्थिती असल्याशिवाय खरीप पिकांच्या पेरणीची घाई करू नये.अजिंक्य दुधाने, तालुका कृषी अधिकारी, दौंड