यवत: कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेदरम्यान 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू होणे, ही साधी चूक नसून हा सरळसरळ वैद्यकीय गुन्हाच आहे, अशा तीव शब्दांत जिल्हा परिषदेचे सदस्य तुषार थोरात यांनी खोर येथील रंजना बाबू केसकर यांच्या मृत्यू प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुका हादरला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
खोर येथील रंजना केसकर या महिलेने कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया केली. मात्र, उपचारांदरम्यान झालेल्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेमुळे दोन लहान निरागस मुलांचे मातृछत्र हरपले असून, केसकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे सदस्य तुषार थोरात यांनी तातडीने खोर येथे धाव घेतली. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेतला. या वेळी त्यांनी प्रशासनावरही तीव शब्दांत टीका करीत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.
तुषार थोरात म्हणाले की, एका 22 वर्षीय तरुणीला अशा निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागणे अत्यंत लज्जास्पद आणि संतापजनक आहे. दोन चिमुकल्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, याला जबाबदार कोण? अशा घटना वारंवार घडत असतील तर आरोग्य व्यवस्थेवर लोकांचा विश्वास कसा राहणार? दोषींना वाचविण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही.
या प्रकरणाची वरिष्ठपातळीवर सखोल चौकशी झालीच पाहिजे. संबंधित डॉक्टर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. दरम्यान, याप्रकरणी पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोमवारी अधिकृत निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निवेदनाद्वारे संपूर्ण घटनेची चौकशी, दोषींवर कारवाई आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली जाणार आहे.