राहू: दौंड तृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने केलेले काम कौतुकास्पद आहे. अवघ्या काही दिवसांत दौंड बाजार समिती पुणे जिल्ह्यात अव्वल दर्जाची ठरेल, असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा, शेतकरी मेळावा व ’स्व. सुभाषअण्णा कुल कृषिभूषण’ पुरस्कार वितरण सोहळा केडगाव (ता. दौंड) येथील बाजार समितीच्या आवारात शनिवारी (ता. 21) उत्साहात पार पडला, त्या वेळी आ. कुल बोलत होते. (Latest Pune News)
बाजार समितीच्या विविध योजनांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, समितीने आधुनिक बाजारपेठ उभारणी, शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावेत, यासाठी केलेली काटेकोर व्यवस्था तसेच शेतमाल साठवणूक, मोजणी व तोलणी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवली आहे. त्यामुळे शेतकरी विश्वासाने बाजार समितीकडे शेतमाल आणत आहेत.
बाजार समितीत सत्तांतर झाल्यानंतर बाजार समितीने शेतकरी व व्यापारीहिताचे भक्कम धोरण अवलंबले तसेच यवत व पाटस येथे उपबाजार स्थापन करण्याबाबत ठोस भूमिका घेतली. पुढील काळात शेतकरी कल्याणासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी संस्थेचे सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे, भीमा-पाटसचे उपाध्यक्ष नामदेव नाना बारवकर, माऊली ताकवणे, निळकंठ बापू शितोळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हरीभाऊ ठोंबरे, भीमा-पाटसचे माजी संचालक महेश अण्णा भागवत, धनजीभाई शेळके, भीमा-पाटसचे संचालक तुकाराम ताकवणे, आप्पासाहेब हांडळ, एम. डी. अण्णा फरगडे, आबासाहेब खळदकर, तानाजी दिवेकर, लक्ष्मण तात्या रांधवन, अरुण आटोळे, सर्जेराव जेधे यांच्यासह सर्व संचालक, सभासद, हमाल, मापाडी तसेच पुरस्कारप्राप्त शेतकरी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले. प्रास्ताविक सभापती गणेश जगदाळे यांनी केले. कालिदास रुपनवर यांनी आभार मानले.