देऊळगाव राजे: काळेवाडी (ता. दौंड) येथे उभारण्यात येत असलेल्या 6 मेगावॅट क्षमतेच्या सोलर पॉवर प्रकल्पाच्या वीज वाहिनीबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित एम.एस.के.वाय. 11 सोलर प्रायव्हेट लिमिटेड (अवादा) कंपनी व ठेकेदारांनी शेतकऱ्यांची कोणतीही संमती न घेता थेट पिकांमधून उच्चदाब वीज लाइन टाकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
काळेवाडी परिसरातील 6 गावांना दिवसा वीजपुरवठा देण्यासाठी सोलर प्रकल्पाचे काम सुरू असून, दुसऱ्या टप्प्यात काळेवाडी सोलर स्टेशन ते महावितरणच्या देऊळगाव राजे 33/11 के.व्ही. उपकेंद्रादरम्यान वीज लाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, देऊळगाव-बोरिबेल रस्ता गट क्रमांक 242 लगत असलेल्या शासकीय वनजमिनीवरून लाइन टाकणे सोयीचे व कमी खर्चीक असताना, संबंधित ठेकेदारांनी गट क्रमांक 280, 281, 282, 347/17, 368/6 आदी शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीतून व पिकांतून वीज लाइन टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या कामाबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नसून, शेतकऱ्यांची लेखी संमतीही घेतलेली नाही. याला विरोध केल्यास कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी दमदाटी करीत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ’लाइन इथूनच जाणार, जिथे जायचे तिथे जा,’ असे सांगितल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी 19 नोव्हेंबर 2025 रोजी दौंड पोलिस ठाण्यात संबंधित कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रकल्पास मंजुरी देताना तयार करण्यात आलेला सर्व्हे नकाशा व आराखडा वारंवार मागणी करूनही कंपनीकडून उपलब्ध करून दिला जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
वीज लाइन ही सहा तारांची उच्चदाब वाहिनी असल्याने भविष्यात शेतीपिके, फळबागा तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासन व महावितरणकडे मंजूर आराखडा व नकाशा, अंदाजपत्रकाची प्रत, शेतकऱ्यांची संमती नसताना लाइन वळविण्याचे आदेश कोणी दिले याची माहिती तसेच झालेल्या व संभाव्य नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप न झाल्यास दौंड पोलिस ठाणे व तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संपत जाधव, जोसेफ यादव, रमेश इंगवले, गुलाब इनामदार, महेंद्र सोनवणे, सागर तनपुरे, तुषार गिरमकर, दीपक गिरमकर, भरत जाधव, प्रशांत गूळमकर, सतीश पाटील, शिवाजी औताडे, रामचंद्र केंडे व भाऊसाहेब गिरमकर यांनी दिला आहे.