जिल्ह्यातील धोकादायक पूल पाडा : उपमुख्यमंत्री अजित पवार File Photo
पुणे

Dangerous Bridges: जिल्ह्यातील धोकादायक पूल पाडा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला आदेश

शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्यातील धोकादायक पुलांच्या बाबतीत बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा केली

पुढारी वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर काही पुलांची दुरुस्ती करून ते वापरणे शक्य आहे, मात्र काही पूल धोकादायक असल्याने ते पाडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे पवार यांनी रविवारी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, जिल्ह्यातील पुलांची सद्य:स्थिती आदी विषयांवर अधिकार्‍यांची बैठक घेतली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

कुंडमळा येथील दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 61 धोकादायक पूल तत्काळ पाडण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले होते. या सर्व परिस्थितीचा आढावा पवार यांनी रविवारी घेतला.

पवार म्हणाले, हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्यातील धोकादायक पुलांच्या बाबतीत बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्थापन केलेल्या समितीपेक्षा सचिवांची समिती वरिष्ठ आहे. या समितीला जिल्हा प्रशासन सर्व माहिती देईल.

हिंजवडीतील वाहतूक कोंडी होणार्‍या ठिकाणांची मागील रविवारी पाहणी केली होती, त्या वेळी काही सूचना अधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले आणि कोणती कामे झाली, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. हिंजवडीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यावर भर आहे. कासारसाईवरून निघणार्‍या कालव्यावरून रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतचा आढावा घेण्यात आला. अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली आहे. काही रस्ते मोकळे करून घेण्यात येत आहेत. तसेच, ओढे-नाल्यांवर बांधलेल्या काही इमारती पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तिथे किती पाऊस होतो, कोणत्या ओढ्यात किती पाणी येत आहे, लांबी-रुंदी किती आहे, याविषयीचा सर्व्हे करायला सांगितले असल्याचे पवार यांनी सांगितले. सर्व काम वेळेत करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले.

...तर पोलिसांचा हिसका दाखवला जाईल

पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात आरोपीने केलेल्या तोडफोडीसंदर्भात विचारले असता, पवार म्हणाले, सहकारनगर पोलिस ठाण्यातील तोडफोडीच्या घटनेवरून ‘कायद्याचा धाक राहिला नाही’ असं म्हणण्याचा सर्वसामान्य नागरिकांना अधिकार आहे. पोलिसांवर जर नागरिक हात उचलत असतील तर अशा व्यक्तींना पोलिसांचा हिसका दाखवला जाईल. अशा घटना घडू नयेत, म्हणून पोलिस काळजी घेत आहेत. आरोपी पकडल्यानंतर त्याच्याकडील साहित्य काढून घेतले जाईल, तशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT