पुणे : पुढारी वृत्तसेवा
जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे १ हजार ७४ हेक्टरवरील पिके व फळबागा बाधित झालेल्या आहेत. ३३ टक्क्यांपेक्षा पिकांचे अधिक नुकसान झालेल्या सात तालुक्यांतील शेतकऱ्यांची संख्या सुमारे ३ हजार ९४८ इतकी आहे.
त्यापोटी संबंधित शेतकऱ्यांना २ कोटी ४ लाख १ हजार २७९ रुपयांइतकी मदत मिळणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काचोळे यांनी दिली.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेती आणि फळपिकांच्या नुकसानीचा ताजा अहवाल कृषी विभागाने तयार केलेला आहे.
त्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनीही हा अहवाल अंतिम केल्यामुळे ताजी आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
जिरायत पिकांचे अधिक नुकसान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अहवालात बागायत पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
त्यानुसार फळपिके सोडून जिरायत पिकांखालील २ हजार ७६९ शेतकऱ्यांचे ६५५.४८ हेक्टर, फळपिके सोडून बागायत पिकांखालील १ हजार १२९ शेतकऱ्यांचे ४०३.७४ हेक्टर आणि फळपिकांखालील बाधित क्षेत्राच्या ५० शेतकऱ्यांचे १५.०८ हेक्टर मिळून एकूण ३ हजार ९४८ शेतकऱ्यांचे १ हजार ७४ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचेही काचोळे यांनी स्पष्ट केले.