पुणे: महापालिकेसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेवरून राजकीय वाद वाढले आहेत. प्रभागरचना करताना भारतीय जनता पक्षाने सरळ हस्तक्षेप केला असून, सर्वच प्रभागांची तोडफोड करून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने केला आहे.
या रचनेविरोधात हरकती दाखल करण्यात आल्या असून, आवश्यकतेनुसार उच्च न्यायालयातही दाद मागण्यात येईल, अशी माहिती या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांनी मंगळवारी दिली. काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापू पठारे, माजी आमदार दीप्ती चवधरी, अंकुश काकडे, गोपाळ तिवारी, अजित दरेकर, रवींद्र माळवदकर आदी उपस्थित होते. (Latest Pune News)
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, या प्रभागरचनेत भाजप नेत्यांचा थेट हस्तक्षेप आहे. यापूर्वीच आम्ही हा आरोप केला होता आणि जाहीर झालेल्या प्रभागरचनेच्या नकाशावरून तो खरा ठरला आहे. प्रभाग क्रमांक 3, 6, 13 मध्ये नदी आणि महामार्ग ओलांडून कृत्रिमरीत्या प्रभाग तयार करण्यात आले आहेत.
एका भाजप नेत्याने आपल्या भागात मागासवर्गीयांचे आरक्षण लागू पडू नये, म्हणून आयोगाचे तत्त्व डावलले आहे,’ असा आरोपदेखील शिंदे यांनी केला. या रचनेत नागरिकांच्या सोयीचा विचार केलेला नाही. विशिष्ट समाजाचे प्रतिनिधी निवडून येऊ नयेत, म्हणून भाजपने जाणूनबुजून अशी विभागणी केली आहे. प्रशासकीय व्यवस्थेत न्याय मिळणे अवघड असल्याने आम्ही उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असे शिंदे म्हणाले.
प्रशांत जगताप म्हणाले, ’प्रभागरचनेत छोट्या वस्त्या, सोसायट्यांचे तुकडे केले गेले आहेत. शेवाळवाडीला फुरसुंगी- वडगावशेरीला जोडले आहे, तर समाविष्ट गावे आणि खराडी एकत्र आणून प्रचंड विसंगत प्रभाग तयार केला आहे.
काही प्रभागात 70 हजार तर काही ठिकाणी दीडलाख मतदार आहेत. काही भागात चार पोलिस ठाणे आणि चार विधानसभा मतदारसंघांचे क्षेत्र येते. मागासवर्गीयांवर मोठा अन्याय झाला आहे. हरकतींसाठी मुद्दाम गणेशोत्सवाचा कालावधी निवडण्यात आला आहे. आठ सप्टेंबरपर्यंत आम्ही समविचारी पक्षांसह उच्च न्यायालयात याचिका दाखल करू.
पठारे म्हणाले, ’ही रचना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून केली आहे. यात कुठलाही समानतेचा विचार दिसत नाही. जनता याचे उत्तर देईल.’ दीप्ती चवधरी म्हणाल्या, ’प्रभागांचे नकाशेच दाखवतात की, नियमांचे पालन झालेले नाही. विरोधकांबरोबरच सत्ताधार्यांनी समाजावरही अन्याय केला आहे.’
काकडे म्हणाले, ‘हरकतींवर काय निर्णय होतो, ते पाहू. मात्र आवश्यकतेनुसार आम्ही न्यायालयात जाणार आहोत.’ दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. मात्र, पक्षाची बैठक झाल्यानंतर तेही हरकती दाखल करतील, असा दावा या वेळी करण्यात आला.