सुनील माळी
... आणि अखेर काँग्रेसचा सुवर्णकाळ सुरू झाला. देशभर ज्या पक्षाची सद्दी होती, ज्या पक्षाला विजयश्री सहजी माळ घालत होती, त्या काँग्रेस पक्षाला पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ताच मिळत नव्हती. मात्र, १९९२ पासून काँग्रेसचा खऱ्या अर्थाने पुण्यातला सुवर्णकाळ सुरू झाला. तुम्हाला आता ऐकायला आश्चर्य वाटेल, की गेल्या म्हणजे २०१७ च्या निवडणुकीत १६२ पैकी फक्त ११ जागा ताब्यात आलेली काँग्रेस एकेकाळी महापालिकेतल्या निम्म्या जागा खेचत होती आणि बोलबाला होता तो केवळ काँग्रेसचाच. (Latest Pune News)
महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून चाळीस वर्षे सत्ता मिळविण्यात अपयश पदरात पडलेल्या काँग्रेसची सद्दी १९९२ पासून सुरू झाली आणि तेव्हापासूनची तब्बल पंचवीस वर्षे या पक्षाने स्वबळावर किंवा आपल्याच पक्षापासून फुटून निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या दुसऱ्या शाखेसह राज्य केले. अर्थात, याला अपवाद होता तो फक्त पुणे पॅटर्नच्या दोन वर्षांचा.
काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर केवळ १९६८ च्या निवडणुकीत महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळवली असली, तरी त्या पक्षाचे अस्तित्व आणि प्रभाव जाणवत होताच. नागरी संघटनेने तीनदा सत्ता काबीज केली तरी आणि १९७९ मध्ये जनता पक्ष प्रभावी ठरला तरीही. जनता पक्ष ७९ मध्ये प्रभावी ठरला, तरी त्यानंतर तो लगेचच फुटला आणि काँग्रेसजनांसह इतरांचे फावले. त्या काळानंतर काँग्रेसेतर सर्व पक्षाच्या मंडळींनी कट्टर काँग्रेसविरोधातून एक होण्यास सुरुवात केली आणि १९८५ मध्येही त्यांची ही एकी कायमच होती. मात्र, १९९२ ची निवडणूक आली आणि काँग्रेसने आपण गल्लोगल्लीत पोहचलेला आणि
कार्यकर्त्यांच्या लाटांमागून लाटा उसळणारा पक्ष आहोत, ते दाखवून द्यायला सुरुवात केली. काँग्रेसच्या या लाटेने काँग्रेसविरोधक निष्प्रभच झाले.
काँग्रेसच्या या यशामागे अदृश्य नेतृत्व होते ते शरद पवार यांचे आणि दृश्य नेतृत्व होते 'सबसे बडा खिलाडी' असे ज्यांचे वर्णन केले गेले, त्या सुरेश कलमाडी यांचे... महापालिकेच्या १९९२ च्या निवडणुकीत एकूण जागा होत्या १११. त्यातल्या ५२ जागा काँग्रेसने पटकाविल्या. कलमाडी यांचे नेतृत्व ९२ च्या निवडणुकीपासून उदयाला आले. महापालिकेच्या निवडणुकीत कलमाडी ठरवतील, त्याला तिकीट. एवढेच नव्हे तर महापौर-उपमहापौर-स्थायी समिती अध्यक्ष-शिक्षण मंडळ अध्यक्ष-पीएमटी सभापती या पदी कोण बसणार, तेही कलमाडी ठरवू लागले. कर्वे रस्त्याजवळच्या केतकर रस्त्यावर असलेल्या कलमाडी हाऊसला काँग्रेस हाऊस या पक्षाच्या अधिकृत ऐतिहासिक कार्यालयापेक्षा अधिक महत्त्व आले. कलमाडी दिल्लीहून पुण्यात परतले, की त्यांचे स्वागत करण्यासाठी महापालिकेने महापौरांना दिलेल्या मोटारीसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या मोटारी विमानतळावर जातीने उपस्थित असत. कलमाडी यांना घेऊन त्या मोटारी कलमाडी हाऊसला परतत. पक्षाच्या नगरसेवकांच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवरील बैठक, निवडणुकीआधीची व्यूहरचना ही काँग्रेस हाऊसवर नव्हे, तर कलमाडी हाऊसवर ठरे. नव्या पदाधिकाऱ्याचे नाव बंद पाकिटातून कलमाडी हाऊसहून निघे अन् महापालिकेत पोहचे. तिथे सभागृहनेत्याच्या केबिनमध्ये ते पाकीट फोडले जाई अन् नव्या पदाधिकाऱ्याचे नाव जाहीर होई.
कलमाडी यांच्याकडे 'मॅन, मनी अन् मसल' अशा तीन 'एम'ची पॉवर होती. विरोधकांना नामोहरम करण्याची जबरी राजकीय इच्छाशक्ती म्हणजे किलिंग इन्स्टिंक्ट त्यांच्याकडे असल्याने पक्षातल्या विरोधकांबरोबरच विरोधी पक्षीयांनाही ते लीलया खिशात घालत. शरद पवार मुंबईच्या सत्तेत असो वा दिल्लीच्या, 'पुणे मी सुरेशकडे सोपवलंय,' असा त्यांचा संदेश असल्याचे सर्वत्र पसरविण्यात आले होते. उमेदवार निवडीत कलमाडी पवारांना कल्पना देत असल्याचेही सांगण्यात येत असे. काँग्रेसला १९९२ च्या निवडणुकीत ५२ जण निवडून आल्यानंतर बहुमतासाठी लागणारे बळ मिळवण्यासाठी काही अपक्षांची साथ घ्यावी लागली, तरी १९९७ च्या निवडणुकीत १२४ पैकी खणखणीत ६७ जागा मिळवून काँग्रेस स्वबळावर शानदारपणे सत्तेवर आली.... हो, तो होता पुण्यातल्या काँग्रेसचा सुवर्णकाळ...