आळंदी: खेड तालुक्याच्या औद्योगिक भागात येणाऱ्या चिंबळी (ता. खेड) येथील रहिवाशी क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात विजेची समस्या निर्माण झाली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे वेळेच्या वेळी वीज बिले भरून, स्मार्ट मीटर बसलेले असून देखील सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. याबाबत गावातील राजकीय इच्छाशक्तीचा देखील अभाव समोर येत असून, दोन-तीन लोकप्रतिनिधी सोडले तर यावर परखड भाष्य व समस्या सोडवताना कोणीही पुढे येत नसल्याची खंत स्थानिक ग््राामस्थ सोशल माध्यमातून व्यक्त करत आहेत.
गावच्या वाड्या-वस्त्या प्लॉटिंगमुळे लोकसंख्येने भरून गेल्या असून मागणी जास्त व पुरवठा कमी अशी येथील विद्युत पुरवठ्याची स्थिती आहे. याचा फटका स्थानिक गावकऱ्यांना बसत असून त्यांना रोजची कामे करताना देखील वीजपुरवठा नसल्याने गैरसोयचा सामना करावा लागत आहे. सध्या परीक्षांचा काळ असून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना या वीजसमस्येचा सामना करावा लागत आहे. वीज गायब झाल्याने त्यांना अंधारातच अभ्यास करावा लागत आहे.
लोकवस्त्यांवर अधिक क्षमतेचे रोहित्र बसवावेत याकरिता गेल्या दोन वर्षात नागरिकांनी महावितरणकडे अर्ज केले; मात्र तरीही महावितरणचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. अर्ज करून देखील दखल घेतली जात नसेल तर आम्ही काय रस्त्यावरच उतरावे, अशी महावितरण अधिकाऱ्यांची इच्छा आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. चिंबळी गावातील महत्त्वाच्या लोकवस्त्या असलेल्या गावठाण भागात तर रोजच दिवसभर वीज गायब होत आहे. पद्मावती नगर, माजगाव रस्ता परिसर, बटवालवस्ती, जाधवमळा, बर्गेवस्ती, जाधववस्ती, कातोरे-बनकरवस्ती, जैदवस्ती, घरदाळेवस्ती, माजगाव परिसर आदी भागांमध्ये दिवसभरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत.
एकदा वीज गेल्यावर चार ते पाच तासांशिवाय येत नसल्याने नागरिकांना पाणी उपसा करताना, दैनंदिन कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना याचे अधिक नुकसान सोसावे लागत आहे. एकंदरीत चिंबळी गावातील विद्युतपुरवठा व्यवस्थेचे अक्षरशः तीन तेरा वाजले असून येथील संपूर्ण वीजपुरवठा व्यवस्थेचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी योग्य क्षमतेचा रोहित्र बसविण्यात यावा. वाडी-वस्त्यांवर रोहित्राची होणारी मागणी तातडीने पूर्ण करावी अशा मागण्या नागरिकांमधून होत आहे.
...अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन
वाडी-वस्त्यांवर रोहित्र बसविण्याबाबत, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत महावितरणकडे गेल्या दोन वर्षात अनेक नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्याकडे महावितरण अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. येत्या महिनाभरात ही समस्या मार्गी न लागल्यास चिंबळी गाव नागरिक हक्क कृती समिती महावितरणवर मोर्चा घेऊन जाणार असून, मागणी पूर्ण झाल्याशिवाय उठणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.