सुभाष किवडे
पुणे: गुजरात येथून येणाऱ्या चिक्कूचा हंगाम संपल्याने बाजारात तुरळक स्वरुपात चिक्कू दाखल होत आहे. रविवारी बाजारात दहा किलोच्या अवघ्या दोनशे डागांची आवक झाली. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने चिकूच्या भावात दहा किलोमागे दोनशे ते चारशे रुपयांची वाढ झाली.
उन्हाचा चटका त्यात मान्सून लांबणीवर पडून पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारात फळांची आवकेसह प्रतवारीतही घसरण झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कलिंगड, खरबूजाच्या भावात किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे.
मान्सून अद्याप सक्रीय नसला तरी पावसास सुरवात झाल्यानंतर लिंबाला भाव मिळणार नाही, या शक्यतेने शेतकऱ्यांकडून लहान व कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात विक्रीस पाठविण्यात येत आहे. या लिंबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने मागणी अभावी त्याचे घटलेले दर टिकून आहेत. पाण्याच्या तुटवड्याने डाळींबाच्या दर्जात घसरण झाली आहे. दर्जेदार डाळींबाची आवक रोडावली आहे. पावसाच्या आगमनानंतर डाळींबाच्या दर्जासह आवकेत वाढ होईल, असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
फळबाजारात रविवारी (दि. २१) लिंबू १००० ते १ हजार २०० गोणी, मोसंबी १५ ते २० टन, संत्रा १ ते 2 टन, डाळींब ३० ते ३५ टन, पपई १५ ते २० टेम्पो, कलिंगड ७ ते ७ टेम्पो, खरबूज ४ ते ५ टेम्पो, चिक्कू २०० गोणी, पेरु ५०० ते ६०० क्रेट, अननस ५ ट्रक आणि कर्नाटक आंब्याची ९ हजार लाकडी पेटी आणि प्लॅस्टिक क्रेट ४ हजार इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते ९००, मोसंबी : (३ डझन) : ४००-६५० (४ डझन) : २१०-४२०, संत्रा : (१० किलो) : ४००-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 6०-२8०, आरक्ता : १०-६०, गणेश : ५-30, कलिंगड : १५-२५, खरबूज : ३०-४५, पपई : १२-२०, चिक्कू (दहा किलो) : ४००-१०००, पेरु (२० किलो) : २५०-४००, अननस (१ डझन) : १००-६००, आंबा : कर्नाटक हापूस ३ ते ५ डझन (कच्चा) : १५०० ते २१००, (१ किलो) : ९० ते १२०, पायरी (४ डझन) १५०० ते १८००, लालबाग (एक किलो) ३० ते ४९, बदाम (एक किलो) ३० ते ४०, तोतापुरी २५ ते ३५, निलम २५ ते ३५. प्लम (२ किलो) : ४५०-५५०, पीच (७ ते ८ किलो) : ८००-१०००, चेरी (१ किलो) : ४००-५००, जांभूळ (१ किलो) : ८० ते २००.