Hardik Pandya Controversy Pudhari
पुणे

Hardik Pandya: वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्या अडचणीत! पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Controversy: टी-२० विश्वचषक विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपावरून हार्दिक पांड्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Rahul Shelke

Hardik Pandya Controversy: भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण असतानाच अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दमदार विजय मिळवत टी-२० विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाचा आनंद खेळाडू आणि चाहत्यांनी मैदानावरच साजरा केला. भारतीय संघातील सर्व खेळाडू तिरंगा खांद्यावर घेत जल्लोष करत होते. त्याचवेळी हार्दिक पांड्याही आपल्या सहकाऱ्यांसह आणि गर्लफ्रेंड सोबत विजयाचा आनंद साजरा करताना दिसला.

या सेलिब्रेशनदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मैदानावर आनंद व्यक्त करताना दिसत आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी असा आरोप केला की, त्या वेळी त्याच्या अंगावर असलेला राष्ट्रीय ध्वज जमिनीवर पडला आणि तो त्यावर झोपल्याचे दिसत आहे. यावरून तिरंग्याचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वकील वाजेद खान यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत असा दावा करण्यात आला की, राष्ट्रीय ध्वजाचा योग्य सन्मान राखला गेला नाही आणि त्यामुळे राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान झाला आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्राथमिक स्वरूपाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर फिरणारे व्हिडिओ आणि फोटो यांची पडताळणी केली जात आहे. नेमके काय घडले होते, हा प्रसंग कोणत्या परिस्थितीत घडला आणि त्यामध्ये खरोखर राष्ट्रीय ध्वजाचा अवमान झाला का, याचा तपास करण्यात येणार आहे.

दरम्यान, या घटनेवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जणांनी हार्दिक पांड्याच्या वर्तनावर टीका केली असून राष्ट्रीय ध्वजाबाबत संवेदनशीलता अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे अनेक चाहत्यांनी हा आरोप चुकीचा असल्याचे म्हणत खेळाडूवर टीका करणे योग्य नसल्याचेही म्हटले आहे.

टी-२० विश्वचषकातील विजयामुळे भारतीय संघ सध्या चर्चेत असताना हार्दिक पांड्यावरील तक्रारीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पुढील तपासात या प्रकरणाबाबत नेमके सत्य काय आहे, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही ठोस निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT