भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटानजीक असणार्या धोम-बलकवडी उजव्या कालव्यात वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी वाहन कोसळले. ही दुर्घटना शनिवारी (दि. 12) दुपारच्या वेळी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्वांचे प्राण तरुणांनी वाचवले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गाने जाणाऱ्या कार (एमएच 12 टीव्ही 1066) चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याशेजारी असलेल्या धोम-बलकवडीच्या वाहत्या कालव्यात पडली. कालव्यात वाहते पाणी असल्याने कार वाहू लागली. या कारमध्ये पाच जण प्रवास करीत होते.
त्यात दोन पुरुष, एक महिला व दोन अल्पवयीन मुले होती. वेदांत कंपनीतील कामगार कंपनीच्या टेरेस्टवर जेवण करित असताना त्यांना ही घटना दिसली. लागलीच ते कामगार घटनास्थळी धावले. याच वेळी गाडी वाहत जात असताना कंपनीच्या व स्थानिक तरुणांकडून कारमधील पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रसाद पांडुरंग गोळे (रा. शिंद, ता. भोर) याने प्रथम पाण्यात उडी मारली. वेदांत इक्विप सेल्स अँड सर्व्हिस, खंडाळा या कंपनीतील अक्षय कांबळे, लक्ष्मण जगताप, सचिन माने व सहकारी आणि उपस्थित असणार्या सर्वांनी एर्टिका गाडीतील पाच जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. घटनास्थळी गस्तीसाठी उपस्थित असलेले महामार्ग पोलिस विभागाचे पोलिस उपनिरीक्षक गालिंदे, मनोज गायकवाड, बागल व कदम यांनी धाव घेऊन तत्काळ मदत केली.
श्रीमंत श्रीपती शिंदे (वय 72), संकेत श्रीपती शिंदे (वय 13) हे दोघे या घटनेत जखमी असून, त्यांना खंडाळा येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर, श्रीपती श्रीमंत शिंदे, राजका श्रीमंत शिंदे आणि संस्कृती श्रीमंत शिंदे हे सर्व जण सुखरूप आहेत. भोर तालुक्यातील प्रसाद गोळे व सहकार्यांनी कौतुकास्पद कार्य केले असून, त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
हेही वाचा