पुणे; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाडी आणि कर्वेनगर परिसरात पदपथांवर उभारलेल्या पुस्तक घरांकडे माननीयांसह महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तेथील पुस्तके बेवारस स्वरूपात धुळखात पडली आहे. दोन्ही पुस्तक घरांमधील पुस्तके कुलूपबंद असून, धुळीच्या साम्राज्यात अस्ताव्यस्त पडलेली आहेत. महापालिकेच्या मुख्य खात्यांसह क्षेत्रीय कार्यालयांकडून नागरिकांसाठी पायाभूत आणि मुलभूत सेवा सुविधांसह शहराच्या सुशोभीकरणाची कामे केली जातात. याशिवाय नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय विकास निधीतूनही कामे केली जातात.
स्थानिक नगरसेवकांनी दत्तवाडी आणि राजाराम पुलाजवळ कर्वेनगर येथे वाचन संस्कृती जपण्यासाठी आपल्या विकास निधीतून पदपथांवर पुस्तक घरे उभी केली आहेत. सुरुवातीस ही पुस्तक घरे तेथील फलकावर लिहिलेल्या वेळेनुसार उघडी असायची आणि वेळेनुसार बंद व्हायची. या पुस्तक घरांमध्ये टेबल-खुर्च्यांसह पुस्तकांचीही व्यवस्था करण्यात आली.
मात्र, नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यापासून गेली दीड वर्षे या दोन्ही पुस्तक घरांकडे त्या स्थानिक माननीयांसह प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. दोन्ही पुस्तक घरे कुलूप लावून बंद असून, संपूर्ण घरामध्ये धुळीचे व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. घरांमधील टेबल-खुर्च्या व पुस्तके अस्ताव्यस्त पडली असून, पुस्तकांची पाने पावसाच्या पाण्यामुळे भिजली आहेत. काही पुस्तके फाटून तिथेच पडलेली आहेत.
नगरसेवक व महापालिकेच्या वतीने विविध प्रकारचे प्रकल्प व इमारती उभ्या केल्या जातात. मात्र, त्याची देखभाल दुरुस्ती करण्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प व इमारतींची दुरवस्था होते. असाच प्रकार पुस्तक घरांच्या बाबतीत झाला आहे. पुस्तक घर सुरू करावे, त्याची निगा राखावी, यासाठी गेली आठ महिन्यांत दोन वेळा अधिकार्यांना पत्र दिले आहे. मात्र, निधी नाही, असे कारण सांगितले जाते.
– लक्ष्मीबाई दुधाणे, माजी नगरसेविका.
नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी कामे सुचवितात. कोणतेही काम करताना वेगळा विचार करून संकल्पना ठरविल्या जातात. विकास निधीतून उभारलेल्या वास्तूंची देखभाल दुरुस्ती करणे, त्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करणे प्रशासनाचे काम आहे.
– महेश पोकळे, विभागप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)
हेही वाचा