Ajit Pawar Death Mystery: अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणाला एक धक्कादायक वळण लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंधित गंभीर आरोप करत ‘काळी जादू’ आणि ‘अघोरी पूजे’चा दावा केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमुळे या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
मिटकरी यांच्या दाव्यानुसार, बारामतीतील विद्या प्रतिष्ठान AI इमारतीच्या बांधकामा जवळ मध्यरात्री अघोरी पूजा करण्यात आली होती. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी अजित पवार त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी येणार होते, असा दावा त्यांनी केला आहे.
याशिवाय, काटेवाडी येथील अजित पवार यांच्या बंगल्याबाहेरही विचित्र प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, विमान अपघाताच्या आधी बंगल्यासमोर एका बकऱ्याला उलटे टांगण्यात आले होते आणि तिथे धार्मिक विधी करण्यात आला होता.
अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. “अंधश्रद्धेचा विरोध करणाऱ्या दादांवर अंधश्रद्धा मानणाऱ्यांनी हल्ला कसा केला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या सर्व प्रकारामागील सत्य लोकांसमोर आलेच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी अद्याप सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात CBI चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही.