पुणे : अमेरिका इस्रायल व इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशामध्ये इंधनाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यात प्रमुख्याने स्वयंपाकाचा गॅस, एलपीजीचा मोठा तुटवडा झाल्यामुळे सर्व हॉटेल्स, वसतिगृह, सार्वजनिक मेस, कॅन्टीन्स व सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशा स्थितीत लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस तथा एलपीजीला घरगुती बायोगॅस (गोबरगॅस) हा शाश्वत पर्याय असल्याचे मत वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष आणि नॅचरल उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केले.
भारतीय पुरातत्व तंत्रज्ञान अत्यंत प्रगल्भ असून, त्यातूनच अनेक वर्षांपासून आपल्याकडे घरगुती बायोगॅसची (गोबरगॅस) संकल्पना रुजलेली आहे. खेडो-पाडी अनेक शेतकरी कुटुंबाच्या घरी गुरांच्या गोठ्याशेजारी गोबरगॅसचे सयंत्र बसवलेले होते व त्यातून निर्माण होणाऱ्या गॅसवर त्या शेतकऱ्यांचा स्वयंपाक, तसेच लाईट व पाणी उपसण्याचे पंप हे त्यावर चालवले जात. असाच प्रयोग आमच्याकडे गेल्या पाच वर्षांपासून राबवीत असून, ओला कचरा, फूडवेस्ट व शिळे उरलेले अन्न हे या बायोगॅस सयंत्रामध्ये टाकून त्यापासून गॅस तयार होतो
व त्यावरच गेस्ट हाऊसमधील दहा ते पंधरा सदस्यांचा स्वयंपाक नियमितपणे होतो. त्यादृष्टीने स्वदेशीच्या संकल्पनेतून देशाच्या स्वावलंबनासाठी व आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकारण्यासाठी हा पर्याय अत्यंत साधा, सोपा व तातडीने अंमलबजावणी करण्यासारखा असल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे.