भोर: बारामती, सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) रविवारी (दि. २) दुपारी ४.३० च्या सुमारास १०० टक्के भरले. वीजनिर्मिती केंद्र व ४५ स्वयंचलित दरवाजांतून वेळवंडी नदीपात्रात २,६१५ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, असे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी सांगितले.
दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेने धरण यंदा १५ दिवसांनी लवकर भरले. भोर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. विशेषतः भुतोंडे, मळे, पांगारी परिसरात होत असलेल्या पावसाने धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस भाटघर धरण १०० टक्के भरले. भाटघर धरणाची साठवणक्षमता २३ टीएमसी आहे. एकूण ८१ दरवाजे असून, ४५ स्वयंचलित, ३६ अस्वयंचलित आहेत. स्वयंचलित दरवाजातून १००० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
निरा देवघर ९८ टक्के भरले
हिर्डोशी खोऱ्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने निरा देवघर धरण ९८ टक्के भरले आहे. येत्या दोन दिवसांत धरण १०० टक्के भरण्याची चिन्हे आहेत. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ७५०, तर सांडव्यातून २४२१ असा एकूण ३१७१ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. भाटघर धरणक्षेत्रात ७२२, निरा देवघर १५५७, गुंजवणी १६४१, वीर ३५६ असा एकूण ३९३८ मिलिमीटर पाऊस धरणक्षेत्रात पडला.