बारामती: बारामती शहरात गेल्या काही दिवसांत दोन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. विद्यार्थिदशेतच अल्पवयीनांकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना समोर येत असल्याने पालक, शिक्षक आणि समाजामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
किशोरवयातील भावनिक अस्थिरता, अभ्यास व परीक्षेचा ताण, पालकांकडून लादले जाणारे अपेक्षांचे ओझे, मोबाईल व सोशल मीडियाचा वापर, मैत्रीतील तणाव तसेच कौटुंबिक समस्या, यांसारख्या विविध कारणांमुळे मुलींवर मानसिक दडपण वाढल्याचे दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मुला-मुलींशी पालकांचा संवाद कमी झाला असून, तो वाढविण्याची गरज प्रखरतेने निर्माण झाली आहे.
किशोरवय हा आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा मानला जातो. या काळात शारीरिक बदलांसोबतच भावनिक आणि मानसिक बदलही वेगाने होत असतात. एखाद्या छोट्या प्रसंगाचा, मित्र-मैत्रिणींमधील वादाचा, परीक्षेतील अपयशाचा किंवा पालकांच्या नाराजीचा परिणाम मुलांच्या मनावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मात्र, मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य व्यक्ती किंवा सुरक्षित वातावरण उपलब्ध नसल्यास तणाव वाढत जातो. हीच कारणे या दोन्ही आत्महत्यांमागे दिसून येत आहेत. अल्पवयीनांच्या विशेषतः मुलांच्या वर्तनात
झालेला बदल, निराशा, याकडे पालकांनी दुर्लक्ष
करण्याची स्थिती आता राहिलेली नाही. मात्र, रोजच्या जगण्याच्या लढाईत आता आई व वडील हे दोघेही नोकरी करीत असतात. दोघांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे पाल्यांशी संवाद होत नाही. त्यातून काही गोष्टी टोकाला जाऊ लागल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे शाळांनीही गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना मोकळेपणाने बोलता येईल अशी समुपदेशन व्यवस्था आवश्यक आहे.
मोबाईलचा वाढता वापर
ऑनलाइन शिक्षण आणि माहितीच्या सहज उपलब्धतेमुळे मोबाईल विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र, अभ्यासापेक्षा सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स, सततचे चॅटिंग आणि आभासी जगात रमण्याचे प्रमाण वाढले आहे. संपर्कासाठी वापरला जाणारा मोबाईल आता टोकाची भूमिका घेण्याला भाग पाडू लागला आहे. त्यामुळे अल्पवयीनांची समज लक्षात घेता पालकांकडून सातत्याने सुसंवादाची गरज आहे.
गुणांच्या स्पर्धेचा मानसिक ताण
आजच्या स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे मोठे दडपण आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवणे, प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळवणे, इतर विद्यार्थ्यांपेक्षा पुढे जाणे, पालकांच्या अपेक्षा पूर्ण करणे, यासाठी अनेक विद्यार्थी सतत तणावाखाली असतात. अपेक्षित गुण मिळाले नाहीत, तर पालक ओरडतील, ही धास्ती अनेकांमध्ये आहे. अनेकदा पालकांकडूनही पाल्याकडून अवास्तव अपेक्षेचे ओझे लादले जात आहे. त्यासाठी क्लासेस, ॲकॅडमी, भौतिक सुविधांचा मारा केला जात आहे. पालक अशा गोष्टीत मोठा आर्थिक खर्च सोसत आहेत. परिणामी, पाल्यांवरील दडपण अधिकच वाढत जात असल्याचे दिसून येत आहे. पालकांनी मुलांच्या गुणांपेक्षा त्यांच्या प्रयत्नांना महत्त्व देणे गरजेचे आहे.