पुणे: आयुष कोमकर खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी सोमवारी (दि. 29) सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत बंडू अण्णा आंदेकर (वय 70), तुषार नीलंजय वाडेकर (वय 27), स्वराज नीलंजय वाडेकर (वय 23), अमन युसूफ पठाण (वय 25, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुल मेरगु (वय 20), यश सिद्धेश्वर पाटील (वय 19), अमित प्रकाश पाटोळे (वय 19), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय 31). (Latest Pune News)
अभिषेक उदयकांत आंदेकर (वय 21), शिवराज उदयकांत आंदेकर (वय 29), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर(वय 36), मुनाफ रिजाय पठाण (वय 28, रा. नाना पेठ) यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर यापूर्वीच लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय 60, सर्व रा. नानापेठ) आणि वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय 40) यांना येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे.
गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिल ॲड. विलास पठारे यांनी केली. तर आरोपी पोलिस कोठडीत असताना झालेल्या तपासाची माहिती तपास अधिकारी असलेले सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांनी दिली. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
बंडू आंदेकर तसेच सोमनाथ गायकवाड यांच्या टोळी युद्धातून वनराज आंदेकर याचा गेल्या वर्षी गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून झाला होता. या खूनाचा बदला म्हणून गणेश कोमकरचा मुलगा आयुषचा गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गोळ्या झाडून खून करण्यात आला होता, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.