पारगाव: गेल्या चार-पाच वर्षांनंतर प्रथमच कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळू लागला आहे. बाजारभावात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांनी बराकी फोडून कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवण्याची लगबग सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे बराकींमधील कांदा खराब होण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी आता अधिक नुकसान टाळण्यासाठी कांदा विक्रीस प्राधान्य देत आहेत.
आंबेगाव तालुक्यात कांदा हे प्रमुख नगदी पीक असून, मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जाते. यंदा कांदा काढणीनंतर दीर्घकाळ बाजारभाव अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. उत्पादनखर्च वाढला असतानाही समाधानकारक दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले होते. कांद्याच्या बाजारभावात वाढ व्हावी, अशी मागणी शेतकरी सातत्याने करीत होते.
मागील पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात लक्षणीय सुधारणा झाली. काही बाजारपेठांमध्ये कांद्याला प्रतिकिलो ३० रुपयांहून अधिक दर मिळाला. त्यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली. त्यानंतर दरात किंचित घसरण झाली असली, तरी सध्या प्रतिकिलो २५ ते २८ रुपये, असा समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात सलग झालेल्या जोरदार पावसाचा कांदासाठ्यावर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले, तर काही शेतकऱ्यांच्या बराकी आणि आरणींमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कांदा सडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आणखी नुकसान होण्यापूर्वी शेतकरी कांदा बाहेर काढून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत.
पावसामुळे घोड नदीला आलेल्या पुराचा फटका पारगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांना बसला. पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने कांद्याच्या बराकींनाही धोका निर्माण झाला. पारगाव येथील शेतकरी पांडुरंग ढोबळे यांच्या कांद्याच्या बराकीखालून पुराचे पाणी वाहून गेले होते. संभाव्य नुकसान लक्षात घेऊन त्यांनीही आता बराकी फोडून कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात केली आहे.
सध्या समाधानकारक बाजारभाव आणि पावसामुळे वाढलेला सडण्याचा धोका, या दोन्ही कारणांमुळे आंबेगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी बाजारपेठांकडे वळले आहेत. पुढील काही दिवसांत बाजारात कांद्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.