Alandi Padya Puja Controversy
आळंदी, तुषार झरेकर : संत परंपरेत चंद्र-सूर्य अस्तित्वात असेपर्यंत पूजन हे केवळ माऊलींच्या पादुकांचेच व्हावे, असा भाव वारकरी संप्रदायात मानला जातो. मात्र, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ यांनी काही साधकांकडून पाद्यपूजा करून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर संबंधित विश्वस्त किंवा संस्थान कमिटीची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आळंदीतील धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत काही साधक योगी निरंजननाथ यांच्या पायांना पाणी अर्पण करून पाद्यपूजा करताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकारावरून वारकरी भाविक व सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर टीका व्यक्त होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पूजन ही वारकरी परंपरेची मुख्य ओळख असताना एखाद्या व्यक्तीची अशा प्रकारे पूजा होणे योग्य नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
यासंदर्भात संत साहित्याचा दाखला देत वारकरी संप्रदायातील काही अभ्यासकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओळी उद्धृत करत,
“काय करावें तें पूजन । ज्यानें वाढे अभिमान ॥
नको नको हा लौकिक । अंगीं लागले हें विख ॥”
असा संदेश संतांनी दिला असल्याची आठवण करून देण्यात येत आहे. संत परंपरेत अभिमान, लौकिक आणि व्यक्तिपूजेला स्थान नसून नम्रता आणि समत्व हीच खरी शिकवण असल्याचेही भाविकांकडून नमूद केले जात आहे.
सोशल मीडियावर या घटनेवरून तीव्र शब्दांत टीका होत असून, “माऊलींच्या पादुकांचे पूजन ही वारकरी परंपरेची शाश्वत परंपरा आहे. व्यक्तिपूजेमुळे संत विचारांचे विकृतीकरण होऊ नये,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. “एकमेका लागतील पायी रे” ही समतेची शिकवण असलेल्या वारकरी परंपरेत अशा प्रकारच्या घटनांमुळे संभ्रम निर्माण होत असल्याचेही काही भाविकांचे मत आहे. या प्रकरणावर संबंधित विश्वस्त किंवा संस्थान कमिटीची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आळंदीतील धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.