आळंदी: आषाढी वारी २०२६ निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरातील लाखो भाविक,वारकरी दिंड्या आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.परंतु गेल्या दोन दिवसांपासून आळंदी व पंचक्रोशीत पडत असलेल्या पावसामुळे आळंदीत पूरस्थिती निर्माण झाली आहे.शहरातील पूल व काही धर्मशाळा पाण्याखाली गेल्या आहेत.इंद्रायणी घाट भाविकांसाठी बंद करण्यात आला आहे.मंदिर परिसरात येणाऱ्या रस्त्यांवर देखील पाणी साचले आहे.
या पार्श्वभूमीवर सावधानतेचा उपाय म्हणून आळंदी देवस्थान व नगरपरिषद प्रशासनाने आळंदीकडे येणाऱ्या भाविकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेत थांबण्याचे आवाहन केले आहे. इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले असून सध्या शहरात प्रवेश करणे सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आळंदीकडे प्रवास सुरू केलेल्या वारकरी व भाविकांनी ज्या ठिकाणी आहेत, तेथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, नदीपात्र, घाट परिसर तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांवर जाणे टाळावे, असेही या आवाहनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून सर्वांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे सार्वजनिक आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची आणि आळंदी नगरपरिषद यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, वारकरी व भाविकांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवर्जून सांगण्यात आले आहे.