नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामती येथे विमान लँडिंग होत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह दोन्ही वैमानिक आणि अन्य सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
"महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती," अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
"बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो," असेही मोदी यांनी म्हटले आहे.
"अजित पवार यांना बारामतीमध्ये घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची दुर्दैवी बातमी कानावर आली. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचं राजकारण अळणी, बेचव होईल. रोखठोक बोलणारे, मिश्किल टिपणी करून आपलेसे करणारे असा त्यांचा स्वभाव होता. रोखठोक, दिलखुलास, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता होता. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचं राजकारण अळणी होईल. महाराष्ट्राला अजून काय पाहावं लागेल माहिती नाही," अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.