शिरूर: रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विकासकामे लवकर मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मुंबई येथील बैठकीत रांजणगाव गणपतीसह कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण आदी विषयांवरील अडचणी मांडल्या. यांसह विविध प्रश्नांबाबत मंगळवारी (दि. 23) बैठक झाली. त्यावर संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. (Latest Pune News)
रांजणगाव गणपती हे गाव अष्टविनायकांपैकी एका गणपतीचे स्थान असल्यामुळे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शिवाय या गावाच्या लगत एमआयडीसी आहे.
येथे कामगार, तसेच स्थलांतरीतांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर गावातील पायाभूत सुविधा सक्षम करणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार येथे कामे करताना एमआयडीसीने जिल्हा परिषदेशी समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश बैठकीत दिले.
या बैठकीस माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्राममविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, सचिव डॉ. राजेश देशमुख, एमआयडीसीचे सह-व्यवस्थापक कुणाल खेमनार, दूरदृश्य माध्यमाद्वारे पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आंबेगाव-शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, अमोल जगताप, रांजणगाव गणपतीचे उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर पाटील, माजी सरपंच सर्जेराव खेडकर, कारेगावचे माजी उपसरपंच संदीप नवले आदी मान्यवर उपस्थित होते.