येरवडा भागात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्- हेगारावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. ही घटना गोल्फ चौकाजवळ हॉटेल साई जायकाशेजारी घडली आहे.
सुधीर चंद्रकांत गवस (वय २३, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण रामचंद्र आचार्य (वय ४४), स्वप्निल प्रवीण आचार्य (वय २४), रविकिरण रामचंद्र आचार्य (वय ३५, तिघे रा. जयप्रकाशनगर, येरवडा) या एकाच कुटुंबातील तिघांना अटक केली आहे.
याबाबत गौरी धर्मेंद्र शिंदे (वय ३५, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. सुधीर गवस याचा आचार्य यांच्याशी वाद झाला होता. गवस याच्याविरुद्ध सहा गुन्हे येरवडा पोलिस ठाण्यात दाखल आहेत. येरवडा कारागृहातून त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. मंगळवारी रात्री
गवसचा आचार्य कुटुंबीयांशी वाद झाला होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास जयप्रकाशनगर परिसरात गवस थांबला होता. आरोपी प्रवीण, स्वप्निल, रविकिरण यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. गवस हा गोल्फ कोर्स चौकातील वस्तीमध्ये शिरला.
आकाश मिनी मार्केटजवळ पत्र्याच्या मागे लपला. आरोपींनी गवसला गाठून तीक्ष्ण शस्त्राने वार केले. तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी गवसला ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली.
खून झालेला तरुण सुधीर गवस हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. पूर्ववैमनस्यातून त्याचा खून करण्यात आला असून, आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, परिमंडल-४