पहिले लग्न झाल्याचे लपवत दुसरा विवाह करून विवाहितेला भूत लागल्याचे कारण सांगताना मौलानाकडे घेऊन जाऊन लाल रंगाचे औषध पिण्यास सांगितले आणि नंतर माहेरी सोडणाऱ्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जाविद जमील शेख (वय ३५), जमील शेख (वय ६०), शेहनाझ जमील शेख (वय ५०), नजराना जाविद शेख (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका २६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार २०१९ ते जुलै २०२४ दरम्यान घडला. पत्नीबरोबर तलाक झाला असल्याचे तिला खोटे सांगून तिच्यासोबत लग्न केले. नंतर तिला तुझ्या घरच्यांनी लग्नात हुंडा दिला नाही म्हणून हिणवले. याच दरम्यान आरोपीची पहिली पत्नी फिर्यादीच्या सासरी पुन्हा नांदण्यास आली. त्यांच्यात एकत्र राहत असताना सतत वाद होत होते.
त्यामुळे फिर्यादी आजारी पडल्याने सासरच्यांनी तिला भूत लागले आहे, असे म्हणून एका मौलानाकडे नेले. तेथे त्याने तिला लाल रंगाचे औषध पिण्यास दिले. नंतर तिला तिच्या येरवडा येथील काकांच्या घरी सोडून दिले. पुन्हा तिला नांदायला नेले नाही. त्यामुळे त्या आपल्या चुलत्यासोबत सासरी गेल्या असता त्यांना व त्यांच्या चुलत्यांना सासरच्यांनी मारहाण केली. तसेच, शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन घरातून हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.