नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.८) दुपारच्या सुमारास तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत होते. वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.
शहर व परिसरात सकाळपासून ढगाळ हवामान तयार झाले होते. त्यामुळे जोरदार पाऊस पडेल, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र, सोमवारी (दि.८) दुपारी १ च्या सुमारास पावसाने तासभरच हजेरी लावली. मात्र त्यामुळे ठिकठिकाणी महापालिकेची कामे सुरू असलेल्या रस्ते खोदून ठेवल्या ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांच्या समस्येत वाढ झाली आहे.
मुंबई-ठाण्यासह कोकण किनारपट्टीला पावसाने दणका दिला असताना नाशिकमध्ये अपेक्षेनुसार पाऊस झालेला नाही. शहर व परिसरात सकाळपासून ढगाळ हवामान तयार झाले होते. त्यामुळे जोरदार पाऊस पडेल, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र, दुपारी १ च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. तासभर चाललेल्या पावसामुळे शहराच्या सखल भागांत पाणी साचले. तसेच ठिकठिकाणी महापालिकेची कामे सुरू असलेल्या रस्ते खोदून ठेवल्याने वाहतुकीला त्याचा फटका बसला. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या सीबीएस, शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर आदी भागातील वाहतूक मंदावली. त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागला. शहरात दिवसभरात दोन मिमी पर्जन्याची पावसाची नोंद करण्यात आली.
जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यासह पेठ व सुरगाणा भागात दिवसभरात अधुनमधून हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. तसेच अन्यही तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, पावसाचा म्हणावा तसा जोर नाही. जिल्ह्यात १ जूनपासून ते आजतागायत सरासरी २११ मिमी पर्जन्याची नोंद झाली असून, या कालावधीत तुलना केल्यास हे प्रमाण ८३ टक्के इतके आहे. परंतु, वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत केवळ २३ टक्केच हे पर्जन्यमान आहे.