पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात कापूस बियाण्यांची जादा दराने विक्री केल्यामुळे जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, कृषी विभागामार्फत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील यांनी दिली. दरम्यान, कृषी विभागाच्या कारवायांमध्ये राज्यभरात 1 कोटी 61 लाख 68 हजार रुपये किमतीचा कापसाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
राज्यात तणनाशक प्रतिरोधक तथा एचटीबीटी कापूस बियाणे वापराला बंदी आहे. असे असतानाही शेजारील राज्यांतून माल आणून राज्यात विक्री केला जात असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले. त्यावरून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 4 हजार 568 किलो एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत 66 लाख 85 हजार रुपये आहे. गडचिरोली जिल्ह्यात 55 लाख 32 हजार रुपये किमतीचे 30 क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले आहे.
नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांत तीन ठिकाणच्या कारवाईत 1807 एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या 37 लाख 96 हजार रुपये किमतीच्या पाकिटांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात तीन ठिकाणी 113 बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. त्याची किंमत एक लाख 55 हजार रुपये आहे. सर्व जिल्हास्तरावरून तसेच तालुकास्तरावर भरारी पथकांमार्फत मोहीम स्वरूपात तपासण्या करण्यात आल्या असून, दोषी आढळणार्यांवर कारवाई सुरू आहे.
हेही वाचा