पुणे : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यामध्ये तरुणाईला ग्रामीण भागातच रोजगार मिळण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत महिला शेतकरी आणि बचत गटांच्या माध्यमातून 71 कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत.
प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटात रोजगार देणारी उत्पादन प्रकल्प उभारले जाणार आहेत. कंपन्या स्थापन केल्यानंतर राज्य सरकार, जिल्हा परिषदांमार्फत निधी आणि विविध बँकांच्या माध्यमातून सवलतीच्या व्याजदरातील कर्जरूपी भांडवल उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
निर्माण केलेल्या उत्पादनांना फायदेशीर बाजारपेठ उपलब्ध करून देणे, कच्च्या मालाच्या मूल्यवर्धनाच्या माध्यमातून उत्पादन वाढविणे, बचत गटांची उत्पादन कार्यक्षमता वाढवणे, बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची गुणवत्ता सुधारणे ही या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे असणार आहेत. जिल्ह्यात यापूर्वीपासून राबविण्यात येत असलेल्या एक गट, एक उत्पादनावर अधिक भर दिला जाणार आहे.
राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या उमेद उपक्रमांतर्गत 'महाजीविका अभियान' सुरू केले आहे. या अभियानाची सुरुवात जागतिक महिला दिनी केली आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी 2022-23 हे वर्षे उपजीविका वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. यामध्ये उपजीविका व विपणन (व्यापार) या विषयावर अधिक भर देण्यासाठी नवीन महाजीविका अभियान सुरू केले आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावागावांत रोजगार निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी आतापर्यंत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 39 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय, विविध बँकांच्या माध्यमातून सवलतीच्या व्याजदराने दोनशे कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद