पुणे ; पुढारी वृत्तसेवा: शहराच्या लोकसंख्येत वाढ झाल्याने महापालिकेला 20 टीएमसी इतका पाणी कोटा मंजूर करावा, अशी मागणी महापालिकेने राज्य शासनाकडे केली आहे. त्यासाठी मुळशी धरणातील पाण्याबरोबर अन्य काही पर्यायही महापालिकेने सुचविले आहेत.
शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी 1997 मध्ये जलसंपदा विभागाशी झालेल्या करारनाम्यानुसार सन 2001 पर्यंत 11.5 टीएमसी इतका पाणीकोटा मंजूर करण्यात आला होता. त्या वेळी शहराची लोकसंख्या 31.15 लक्ष इतकी होती.
मात्र, गेल्या 20 ते 22 वर्षांत ती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महापालिकेचा सद्याचा दर दिवशीचा पाणीवापर 1605 एमएलडी इतका झाला आहे. त्यानुसार वार्षिक वापर 20.4 टीएमसी इतका होत आहे. मात्र, प्रत्यक्षात मंजूर कोटा साडेअकरा टीएमसी असल्याने शहरासाठी पिण्याचे पाणी कमी पडते. त्यामुळे पाण्याचा 20 टीएमसी इतका वाढीव पाणी कोटा मंजूर करावा, अशी मागणी आयुक्त विक्रम कुमार यांनी नगर विकास खात्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कृष्णा खोर्यातील भीमा उपखोर्याचे ऊर्ध्व भीमा खोर्यात पश्चिमवाहिनी नाले पूर्वेकडे वळविल्यास 2 ते 3 टीएमसी इतक्या पाण्याची उपलब्धता होऊ शकते. तसेच मुळशीच्या टाटा धरणातून 8 ते 9 पाणी पूर्वेकडे वळवून पावसाळ्यानंतर खडकवासला प्रणालीमध्ये उपलब्ध करून दिल्यास पुणे शहरासाठी उपयोगी आणता येईल, असे पर्याय महापालिकेने सुचविले आहेत.
'मुळशी'बाबत आज बैठक
मुळशीच्या टाटा कंपनीच्या धरणातून 5 टीएमसी पाणी आणण्याचा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेने यापूर्वीच मंजूर केलेला आहे. हे पाणी आणण्यासंदर्भात महापालिका, पाटबंधारे यांच्या अधिकार्यांची एकत्रित बैठक मंगळवारी (दि. 21) होणार आहे.
हेही वाचा